गणेश चतुर्थी माहिती मराठी – Ganesh Chaturthi Information In Marathi

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन होते. त्यामुळे या चतुर्थीला ‘गणेशचतुर्थी’ म्हणतात.

गणपती हा मुळात आर्यांचा देव नव्हे. भारतातल्या मूळ रहिवाशांचा हा देव आहे. पुढे तो आर्यांनी आपल्या देवांमध्ये समाविष्ट केला आणि तो शंकर-पार्वतीचा मुलगा होता, अशा कथा तयार झाल्या.

ganesh

गणेशपुराणात असे सांगितले आहे की, गणपती हा मुळात गणेश नसून गुणेश आहे. सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा तो अधिपती आहे. गणपती ओंकारस्वरूप आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचे पाय म्हणजे अकार, त्याचे मोठे पोट म्हणजे ऊकार आणि मस्तक म्हणजे मकार असा त्याच्या स्वरूपाचा उलगडा केला आहे.

गणपतीची पूजा घरोघर वर्षभर होते. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम श्रीगजाननाची पूजा करतात. कारण तो विघ्नहर्ता आहे. महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीस ‘विनायकी चतुर्थी’ म्हणतात. त्या दिवशी गणपतीची पूजा करून सबंध दिवस उपवास करतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हणतात.

त्या दिवशी गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन झाले, की उपवास सोडतात. माघ महिन्यात गणेशजन्माचा उत्सव असतो. महाराष्ट्रात गणपतीची आठ पवित्र स्थाने आहेत. कोकणात पुळे येथे आणि कर्नाटकात इडगुंजी येथेही गणपतीची प्रसिद्ध स्थाने आहेत. तसेच भारताबाहेरही अनेक देशांत गणपतीची भक्ती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आवडता सण आहे. मुंबईत काम करणारी कोकणातली माणसे सुटी घेऊन गणेशचतुर्थी साजरी करायला गावी जातात. मुले गणपतीचे मखर, आरास अशी सारी तयारी चार दिवस आधीपासून सुरू करतात. पुरुष खरेदीच्या गडबडीत असतात. गणपतीच्या पूजेसाठी फुले, कमळे, केवडा, दुर्वा, शमी हे सारे साहित्य आवश्यक असते. बायकांना सोवळ्याने स्वयंपाक करायचा असतो. नैवेद्याला नारळ व गुळाचे सारण भरलेले उकडीचे मोदक करतात. सकाळी स्नान उरकून सारे गणपतीची मूर्ती आणायला निघतात. मूर्ती घरी आणल्यावर गणपतीची षोडशोपचारे पूजा, नैवेद्य व आरती होते.

गणेशचतुर्थी हा गजाननाच्या पराक्रमाचा स्मरणदिन आहे. अशी कथा आहे की, गणासुर नावाचा राक्षस फार त्रास देऊ लागला. तेव्हा घाबरलेले देव, मानव व प्राणी श्रीविष्णूला शरण गेले. श्रीविष्णूने शिव-पार्वतीचा मुलगा म्हणून गणपतीच्या रूपाने जन्म घेतला व गणासुराला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मारले. तेव्हापासून या दिवशी गणपतीची आराधना करण्याची पद्धत पडली. गणपतीची मातीची मूर्ती या दिवशी घरी आणतात व नंतर प्रत्येक घरच्या प्रथेप्रमाणे दीड, पाच, सात अगर दहा दिवस पूजा, आरती असे कार्यक्रम चालतात.

गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करत नाहीत. अशी कथा सांगतात की, गणपती उंदरावर बसून चालला असताना तोल जाऊन पडला. तेव्हा चंद्र त्याला हसला. गणपतीने रागावून त्याला शाप दिला की, ‘गणेशचतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल.’ पण हे एक रूपक आहे असे मानतात. चंद्र ही मनाची देवता आहे. मन चंचल असते. चंद्राचे दर्शन न घेणे म्हणजे मनावर ताबा ठेवणे. तसेच उंदीर हे कालाचे प्रतीक आहे. उंदीर ज्याप्रमाणे वस्तू कुरतडतो त्याप्रमाणे काल हा सर्व सृष्टीचा नाश करत असतो. गणपतीने या कालाला जिंकून आपले वाहन बनवले. गणपतीला मोदक आवडतात. मोद म्हणजे आनंद. म्हणजेच गणपती सच्चिदानंद-स्वरूपी आहे.

गजानन या नावाच्या संदर्भातही एक कथा सांगितली जाते. पार्वतीने स्नानाला जाताना एक मुलाची मूर्ती तयार केली व आपल्या सामर्थ्याने त्या मुलाला सजीव केले. त्यास दारावर पहारा करण्यास बसवून ती स्नानाला गेली. त्या मुलाने शंकरांना आत येताना अडवले तेव्हा शंकराने रागाने त्याचे डोके उडवले. नंतर हा पार्वतीचा मुलगा आहे हे कळल्यावर त्याला हत्तीचे डोके लावून त्यांनी पुन्हा जिवंत केले, ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे पार्वतीच्या या मानसपुत्राला ‘गजानन’ असे नाव पडले.

घरगुती/धार्मिक स्वरूपात गणपती अनेक वर्षे पुजला जात होता; पण लोकमान्य टिळकांनी १८९३ साली गणेशोत्सवास सार्वजनिक रूप दिले. लोकांनी संघटित व्हावे आणि त्यांच्यांत जागृती व्हावी, त्यांचा देशाभिमान वाढावा अशी त्यामागची कल्पना होती.

समाजाला संघटित करण्यासाठी उत्सवाचा उपयोग करून घेण्यामागे त्यांचा आणखीही एक हेतू होता. इंग्रज राज्यकर्ते धार्मिक कार्यात हस्तक्षेप करत नसत. उत्सवाच्या मार्गाने समाजाचे संघटन करण्यास सुरुवात केली तर त्यात इंग्रजांची आडकाठी होणार नाही हे त्यांनी जाणले होते. आणि गणेश हे सर्व समाजाचे आवडते दैवत असल्यामुळे समाजही या निमित्ताने चटकन एकत्र येईल हे त्यांना माहीत होते.

लोकमान्यांचा हा अंदाज अगदी योग्य ठरला. थोड्याच कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवाने महाराष्ट्रात सर्वत्र मूळ धरले. उत्सवाच्या माध्यमातून मेळावे, व्याख्याने, प्रवचने अशा मार्गाने प्रबोधनालाही सुरुवात झाली.

पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले व समाजप्रबोधनापेक्षा करमणूक, सजावट यांचे महत्त्व वाढत गेले. आता तर मिरवणुकीतील अपप्रवृत्ती, ध्वनिप्रदूषण अशा विविध कारणांनी उत्सवाकडे नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मात्र अजूनही लोकांच्या मनातील या उत्सवाचे स्थान मानाचे आहे. महाराष्ट्रच नव्हे तर गोव्यातही हा महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन अनंतचतुर्दशीला होते. मुंबईला मोठे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर जातात. पुण्यात नदीवर जातात. इतर ठिकाणीही नदीवर अगर तळ्यांवर मिरवणुकीने गणेशमूर्तींचे विसर्जन होते.

दहा दिवस प्रेमाने आणि श्रद्धेने पूजलेल्या गणपतीला निरोप देताना सर्वांची मने भरून येतात आणि तोंडातून शब्द येतात,

गणपती बाप्पा मोरया ।
पुढल्या वर्षी लवकर या ॥

गणेश चतुर्थी माहिती मराठी – Ganesh Chaturthi Information In Marathi

पुढे वाचा:

FAQ

गणेश चतुर्थी मराठी सण आहे का?

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्र राज्यासह भारतात साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे जिथे त्याला खूप महत्त्व आहे.

गणेश चतुर्थी किती तारखेला आहे?

हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थीची तारीख दरवर्षी बदलते. 2023 मध्ये गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे.

गणेश चतुर्थी 10 दिवस का साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी 10 दिवसांसाठी साजरी केली जाते कारण ती भगवान गणेशाची जयंती आहे, ज्याचा जन्म हिंदू चंद्र महिन्याच्या भाद्रपदाच्या तेजस्वी पंधरवड्याच्या चौथ्या दिवशी झाला असे मानले जाते.

गणेश चतुर्थीची सुरुवात कोणी केली?

गणेश चतुर्थीची उत्पत्ती स्पष्ट नाही, परंतु ती प्राचीन काळापासून साजरी केली जात असल्याचे मानले जाते. मराठा शासक, शिवाजीच्या काळात याला महत्त्व प्राप्त झाले आणि 19व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी त्याचे पुनरुज्जीवन केले.

गणेश चतुर्थीची कथा काय आहे?

गणेश चतुर्थीची कथा वेगवेगळ्या हिंदू परंपरेनुसार बदलते, परंतु ती सामान्यतः भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र भगवान गणेश यांचा जन्म साजरा करते.

मोठ्या मूर्ती असलेले गणेशोत्सव पंडाल काय म्हणून ओळखले जाते?

मोठ्या मूर्ती असलेले गणेशोत्सव मंडळे “सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ” किंवा फक्त “गणेश उत्सव मंडळ” म्हणून ओळखले जातात.

मुंबईत गणेश चतुर्थीला कुठे जायचे?

मुंबईत, गणेश चतुर्थी दरम्यान भेट देण्याच्या काही लोकप्रिय ठिकाणांमध्ये लालबागचा राजा, सिद्धिविनायक मंदिर आणि अंधेरी, घाटकोपर आणि इतर भागातील गणेश पंडाळे यांचा समावेश होतो.

कर्नाटकातील गणेश चतुर्थीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

कर्नाटकातील बेंगळुरू (बंगलोर) शहर गणेश चतुर्थीच्या भव्य उत्सवांसाठी देखील ओळखले जाते.

गणेश विसर्जन कोणत्या दिवशी केले जाते?

गणेश विसर्जन, जे उत्सवाच्या शेवटी चिन्हांकित करते, सहसा उत्सवाच्या दहाव्या दिवशी केले जाते, याला अनंत चतुर्दशी देखील म्हणतात.

गणेश तिथी म्हणजे काय?

गणेश तिथी म्हणजे भाद्रपद या हिंदू चंद्र महिन्याच्या तेजस्वी पंधरवड्याच्या चौथ्या दिवसाचा संदर्भ आहे जेव्हा भगवान गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते.

दरवर्षी गणेशमूर्ती आणणे बंधनकारक आहे का?

दरवर्षी गणेशमूर्ती आणणे बंधनकारक नाही. ही वैयक्तिक निवड आणि भक्तीची बाब आहे. अनेक कुटुंबे दरवर्षी एक परंपरा म्हणून मूर्ती आणतात, परंतु ती आवश्यक नसते.

Leave a Reply