Kho Kho Information in Marathi: ज्याप्रमाणे आपल्या शरीरात ताकद निर्माण करण्यासाठी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे शरीर निरोगी होण्यासाठी खेळांची गरज असते आणि खो खो खेळ खूप चांगला असतो जेणेकरून तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवू शकता, हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे. प्राचीन काळापासून खेळला जातो. हा खेळ भारतातच जन्माला आला. आणि भारतातील खो खो चे जन्मस्थान बडोदा मानले जाते.

खो खो खेळाची माहिती मराठी, Kho Kho Information in Marathi
खो खो खेळाची माहिती मराठी, Kho Kho Information in Marathi

खो खो खेळाची माहिती मराठी – Kho Kho Information in Marathi

खो खो खेळाचा इतिहास

खो-खो हा एक भारतीय खेळ आहे. या खेळाचा उगम पुण्यात झाला. ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया‘ ची स्थापना 1960 मध्ये झाली. पहिली राष्ट्रीय स्पर्धा (पुरुष) 1960 मध्ये आयोजित केली गेली. 1961 मध्ये, महिला खो-खो चॅम्पियनशिप सुरू झाली. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो चा प्रात्यक्षिक सामना खेळला गेला, परंतु खो-खोचा आशियाई क्रीडा स्पर्धेत अद्याप समावेश करण्यात आलेला नाही

हा खेळ 1928 मध्ये अखिल महाराष्ट्र शासकीय शिक्षण मंडळाने लोकप्रिय केला होता जेव्हा त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यात 1956-60 मध्ये पहिल्या राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. हे सहसा मातीच्या पृष्ठभागावर खेळले जाते, परंतु आजकाल टेट्रॉन पृष्ठभाग देखील त्याचा वेग वाढवण्यासाठी वापरले जातात.

खो खो खेळाचे कौशल्य

खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात 9 खेळाडू असतात आणि 3 खेळाडू पर्याय असतात. प्रत्येक सामना चार डावांमध्ये खेळला जातो. प्रत्येक डाव सात मिनिटांचा आहे. प्रत्येक संघ दोन डावांमध्ये बसतो आणि दोन डावांमध्ये धावा करतो. बसलेल्या संघातील खेळाडूंना ‘मेजर’ म्हणतात आणि जे खेळाडू पळून जातात त्यांना धावपटू म्हणतात. सुरुवातीला तीन खेळाडू हद्दीत असतात. हे तिघे बाहेर पडल्यावर इतर तीन खेळाडू आत येतात आणि खेळतात.

बसलेल्या खेळाडूंपैकी नववा खेळाडू धावपटूंना पकडण्यासाठी उभा राहतो आणि खेळ सुरू करतो. तो धावणाऱ्या खेळाडूंना नियमानुसार पकडण्याचा प्रयत्न करतो आणि बसलेल्या कोणत्याही खेळाडूला ‘हरवले’. त्यानंतर ज्या खेळाडूला ‘खो’ मिळतो तो उठतो आणि धावपटूंना पकडतो आणि त्याची जागा पहिल्या खेळाडूने घेतली आहे. धावपटूला बाद केल्याबद्दल प्रत्येक प्रमुख बाजूला एक गुण दिला जातो. सर्व धावपटूंना त्यांच्या अकाली बाह्यांसाठी ‘लोना’ दिले जाते. डाव संपेपर्यंत हा खेळ खेळला जातो. शेवटी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.

खो खो खेळाचे मैदान माहिती

  1. २७ मी. × १६ मी. (पुरुष‚ महिला‚ कुमार मुले व मुली)
  2. २३ मी. × १४ मी. (किशोर व किशोरी)
खो खो खेळाचे मैदान माहिती

मध्य पाटी – दोन खुंटांना जोडणारी २४ मी. / २० मी. लांबीची व ३० सें.मी. रुंदीची पाटी.

आडवी पाटी – दोन्ही खुंटांमध्ये मध्य पाटीला लंबरूपाने छेदणारी १६ मी. / १४ मी. लांबीची ३५/३० सें.मी. रुंदीची पाटी. (एकूण आठ आडव्या पाट्या)

खुंट – खुंट हे लाकडी व गुळगुळीत असतील. खुंटाचा वरचा भाग सपाट असेल. मात्र‚ त्याच्या कडा धारदार असू नयेत. खुंटाचा परीघ सर्व ठिकाणी सारखा असतो. खुंट हे चौकामध्ये / मुक्त क्षेत्रामध्ये खुंटरेषेच्या मध्यबिंदूस स्पर्श करतील असे रोवलेले असतात.

खुंटरेषा – क्रीडांगणाच्या रुंदीशी समांतर आणि खुंटाला स्पर्श करणारी रेषा.

चौक किंवा – खुंटरेषेपासून अंतिम रेषेपर्यंतचे

मुक्त क्षेत्र – १६ मी. × १.५० मी. / १४ मी. × १.५० मी. मापाचे चौक.

आयत – मध्य पाटी व आडव्या पाट्या एकमेकांशी छेदतात त्या ठिकाणी तयार होणारे ३५ सें.मी × ३० सें.मी.
मापाचे आयत/३० सें.मी.× ३० सें.मी. मापाचे चौरस

क्रीडांगण आखण्याच्या रेषा ३ सें.मी. ते ५ से.मी. रुंदीच्या असतात. रेषेची रुंदी क्रीडांगणाच्या मापातच समाविष्ट असते.

क्रीडांगणाच्या चारही बाजूंना किमान १.५ मी. मोकळी जागा असावी.

क्रीडांगण

(१) क्रीडांगण (२) किशोर व किशोरी

  • खुंटाची जमिनीपासून उंची: १.२० / १.२५ मी. १ मी.
  • खुंटाचा व्यास: ९-१० सें.मी. ८-९ सें.मी.
  • मध्य पाटीची लांबी: २४ मी. २० मी.
  • आडव्या पाटीची लांबी: १६ मी. १४ मी.
  • आडव्या पाटीची रुंदी: ३५ सें.मी. ३० सें.मी.
  • खुंट व पहिली पाटी यांतील अंतर: २.५५ मी. २.१५ मी.
  • इतर पाट्यांतील अंतर: २.३० मी. १.९० मी.
  • खुंटरेषेपासून अंतिम रेषा अंतर: १.५० मी. १.५० मी.
  • मध्य पाटीची रुंदी: ३० सें.मी. ३० सें.मी.

खो खो खेळाचे नियम

१) पंचप्रमुखाने नाणेफेक करावी. नाणेफेक जिंकणारा संघ पळती (संरक्षण)  किंवा पाठलाग (आक्रमण) याची निवड करील.

२) खेळ सुरू होण्यापूर्वी पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू चौरसांवर बाजू रेषेकडे तोंड करून बसतील. सलगच्या खेळाडूंची तोंडे विरुद्ध दिशेला असतील. गतिमान आक्रमक खेळाडू मैदानातील एका खुंटाजवळ मुक्त क्षेत्रात पाठलाग सुरू करण्यासाठी तयार राहील.

३) खेळ सुरू होण्यापूर्वी पळती करणाऱ्या संघाचे पहिले तीन संरक्षक खेळाडू मैदानात असतील. त्यांचे बाकीचे रक्षक खेळाडू राखीव जागेत बसलेले असतील.

४) पंचप्रमुख एक लांब व एक छोटी शिट्टी वाजवून खेळ सुरू करतील.

५) पाठलाग करणाऱ्याने चौरसावर बसलेल्या आपल्या खेळाडूस पाठीमागून खो द्यावयाचा असतो. खो देताना‘खो’ हा शब्द मोठ्याने व स्पष्टपणे उच्चारला पाहिजे. ‘खो’ असे म्हणण्याऐवजी ‘खू’‚ ‘खोऽऽरे’‚ ‘खुई’ असे शब्द उच्चारणे नियमबाह्य आहे. ‘खो’ उच्चारण्याअगोदर त्याचा बसलेल्या खेळाडूच्या पाठीस हाताने स्पर्श झाला पाहिजे. पाठीसच स्पर्श झाला पाहिजे असा आग्रह धरू नये‚ कमरेच्या खालील भागास स्पर्श झाला तरी चालते. हाताने पाठीस स्पर्श करण्यापूर्वी ‘खो’ उच्चारल्यास तो नियमभंग आहे.

खो देताना खो देणाऱ्याच्या पुढच्या पावलाचा स्पर्श आडव्या पाटीशी पाहिजेच असे नाही. तसेच खो देताना त्याचे संपूर्ण शरीर त्या आडव्या पाटीच्या पुढे झुकलेले असले तरी चालेल. मात्र‚ त्याच्या किमान एका पायाचा स्पर्श आडव्या पाटीशी असलाच पाहिजे. बसलेल्या खेळाडूच्या लांबवलेल्या हातास‚ पायास किंवा झुकविलेल्या शरीरास स्पर्श करून ‘खो’ देणे नियमबाह्य आहे.

‘खो’ उच्चारणे व पाठीस स्पर्श होणे एकाच वेळी घडणे नियमबाह्य मानू नये. (एककालिक खो)

६) पाटीवर बसलेल्या खेळाडूने खो मिळाल्याशिवाय पाटीवरून उठावयाचे नाही किंवा तोंड फिरवून बसावयाचे नाही. तसे केल्यास तो नियमभंग समजावा. त्याची पुनरावृत्ती होत असेल‚ तर ती गैरवर्तणूक मानावी.

७) खो देणाऱ्याने खो दिल्यावर ताबडतोब चौरसावर बसले पाहिजे.

८) पाठलाग करणाऱ्याचा एक पाय जोपर्यंत पाटीत आहे तोपर्यंत त्याने पाटी सोडली‚ असे म्हणता येणार नाही.

९) योग्य खो दिल्यावर खो देणाऱ्याचा बसताना पाटीबाहेर तोल गेला‚ तर तो फाउल मानू नये.

१०) खो मिळाल्यावर पाटीवरून उठताना खेळाडूच्या पायाचा विरुद्ध बाजूस प्रथम स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.

११) पाठलाग करणाऱ्याचा मध्य पाटीत किंवा मध्य पाटीच्या पलीकडील जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल समजावा. चौरसावरून उठत असताना गतिमान आक्रमकाला ज्या बाजूस जायचे आहे‚ त्या बाजूच्या मध्य पाटीच्या रेषेस त्याच्या पहिल्या पावलाचा स्पर्श झाला तर तो नियमभंग मानू नये. मात्र‚ त्याचा पाय रेषेच्या पलीकडे पाटीत जाऊ नये.

१२) गडी मारताना किंवा मारल्यानंतर त्या क्रियेचा एक भाग म्हणून पाठलाग करणाऱ्याचा मध्य पाटीला स्पर्श झाला‚ ती छेदली किंवा ओलांडली तर तो नियमभंग मानून पळती करणारा संबंधित खेळाडू नाबाद ठरवावा.

१३) खो मिळाल्यावर उठलेल्या खेळाडूने आपल्यासमोरच्या मैदानात कोणतीही दिशा घ्यावी. एखाद्या खुंटरेषेकडे जाण्याची क्रिया करणे म्हणजे दिशा घेणे होय. एक दिशा घेतल्यानंतर त्याला दिशा बदलता येणार नाही. दिशा बदलणे हा फाउल आहे. (पाठलाग करणाऱ्या खेळाडूने कोणत्याही एका खुंटरेषेकडे दिशा घेतली आणि नंतर ९०० पेक्षा अधिक कोनातून स्कंधरेषा फिरविली‚ तर त्याला दिशा बदलणे‚ असे म्हणतात.)

१४) एक दिशा घेऊन पुढे गेल्यावर पाठलाग करणाऱ्याला मध्येच मागे जाता येणार नाही. मागे जाणे (Receding) हा फाउल आहे. परंतु गतिमान आक्रमक खुंटावर गडी टिपण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा जमिनीवरील पाय मागे घसरला‚ तरी ते मागे हटणे होत नाही.

१५) एकदा दिशा घेतल्यानंतर पाठलाग करणाऱ्याला त्या बाजूची खुंटरेषा ओलांडेपर्यंत जावे लागेल. (मध्येच त्याने खो दिला‚ तर खुंटरेषेपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही.)
१६) मध्य पाटीने विभागलेल्या मैदानाच्या दुसऱ्या भागात जायचे असेल तर पाठलाग करणाऱ्याला खुंटाच्या बाहेरून चौकातून गेले पाहिजे. खुंटाजवळ मध्य पाटीस त्याचा स्पर्श झाला किंवा त्याने मध्य पाटी ओलांडली‚ तर तो फाउल आहे.

१७) चौकात गेल्यावर पाठलाग करणाऱ्याला खुंटाच्या कोणत्याही एका बाजूने विरुद्ध बाजूच्या चौकाकडे जाता येईल.

१८) पाठलाग करणाऱ्याने चौकात दिशा बदलणे किंवा मागे येणे‚ हे फाउल्स नाहीत.

१९) पाठलाग करणाऱ्याचा खुंटाजवळील पाटीतील चौरसावर बसलेल्या खेळाडूस हात लागला‚ तर त्याने त्याला खो दिलाच पाहिजे. पळती करणारा खेळाडू खुंटावर नसेल तर खो देण्याची गरज नाही.

२०) चौरसावर बसलेल्या खेळाडूंनी पळती करणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही‚ असे बसावे. अडथळा आणल्यामुळे पळती करणारा बाद झाला असेल‚ तर त्याला नाबाद ठरवावे.

२१) पळती करणाऱ्या संरक्षक खेळाडूंनी चौरसावर बसलेल्या खेळाडूंना स्पर्श करावयाचा नाही. पळती करणाऱ्याने तसा स्पर्श केल्यास त्याला एकदा ताकीद द्यावी. ताकीद देऊनही त्याने पुन्हा स्पर्श केला‚ तर पळती करणाऱ्यास बाद करावे.

२२) कोणताही नियमभंग न करता पाठलाग करणाऱ्याने पळती करणाऱ्याच्या शरीराच्या कोणत्याही भागास हाताने स्पर्श केल्यास पळती करणारा तो खेळाडू बाद होतो; परंतु पाठलाग करणाऱ्याचा प्रत्यक्ष स्पर्श करताना किंवा स्पर्श करून लगेच फाउल झाला‚ तर पळती करणारा नाबाद ठरवावा.

२३) पळती करणाऱ्याचे दोन्ही पाय अंतिम रेषेच्या बाहेर असतील‚ तर त्याला बाद म्हणून जाहीर करावे. पायाचा क्रीडांगणाशी संपर्क हवाच. गतिमान आक्रमकाने नियमभंग करून संरक्षकास मैदानाबाहेर ढकलले आणि संरक्षकाचे दोन्ही पाय बाहेर गेले असले‚ तरी संरक्षकास बाद देऊ नये.

२४) पाठलाग करणारा खेळाडू अंतिम रेषेच्या बाहेर गेला‚ तरी तो नियमभंग नाही. मात्र‚ त्या वेळी त्याने दिशा बदलली किंवा तो मागे आला‚ तर तो नियमभंग समजावा.

२५) पाठलाग करणाऱ्याचा नियमभंग होताच पंचाने छोटी-छोटी शिट्टी वाजवून त्याला नियमभंगाचे निराकरण करावयास भाग पाडावे. पळती करणारा खेळाडू पळत असलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेस त्याला जायला सांगावे. विरुद्ध दिशेस गेल्यावर त्याने खो दिलाच पाहिजे‚ असे नाही.

नियमभंगाचे निराकरण करण्याच्या पंचांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्याने त्या वेळी पळती करणाऱ्या एखाद्या खेळाडूस स्पर्श केला असेल‚ तर त्याला बाद देऊ नये.

खो खो सामन्याचे नियम

१) प्रत्येक संघात १२ खेळाडू असतील. त्यांपैकी ९ खेळाडू सामन्यात खेळतील आणि बाकीचे ३ खेळाडू राखीव राहतील. (आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघात १५ खेळाडू असतील)

२) सामन्यात एकूण दोन डाव असतील. एकदा पळती (संरक्षण) आणि एकदा पाठलाग (आक्रमण) अशा दोन पाळ्यांचा एक डाव होतो.

३) पळती व पाठलाग या पाळ्या प्रत्येकी नऊ मिनिटांच्या असतात. (पुरुष‚ महिला व कुमार मुले / मुली) किशोर मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येक पाळी सात मिनिटांची असते.

४) दोन पाळ्यांमध्ये पाच मिनिटे (किशोर गटासाठी तीन मिनिटे) व दोन डावांमध्ये नऊ मिनिटे (किशोर गटासाठी पाच मिनिटे) विश्रांतीकाळ राहील.

५) पळती करणाऱ्या संघाचे खेळाडू तीन-तीनच्या गटाने पळतीसाठी मैदानावर येतील. खेळाडू ज्या क्रमाने पळती करणार असतील‚ त्याची नोंद त्या संघाच्या संघनायकाने गुणलेखकाकडे करावी.

६) पळती करणाऱ्या गटातील तिसरा खेळाडू बाद होताच पुढील दोन खो देण्यापूर्वी पुढील गटातील तीन खेळाडूंनी मैदानावर प्रवेश करावा. जे खेळाडू वेळेत मैदानात प्रवेश करणार नाहीत‚ त्यांना बाद म्हणून घोषित करावे. पळती करणाऱ्या संघातील संबंधित गटातील तिसरा खेळाडू बाद झाल्यावर आत येणारे तीन खेळाडू वेळेत मैदानात आले नाहीत म्हणून बाद दिले गेले तर पुढील गटातील तीन खेळाडू मैदानात येण्यासाठी सरपंच १५ सेकंदांचा वेळ देतील.

तिसरा खेळाडू बाद होण्यापूर्वीच पुढील गटातील खेळाडूने मैदानात प्रवेश केला असेल‚ तर त्याला बाद न करता फक्त मैदानाबाहेर पाठवावे. निर्देशित केलेल्या जागेतूनच पळती करणारे त्या गटातील खेळाडू मैदानात प्रवेश करतील.

ज्या पाठलाग करणाऱ्या खेळाडूने गटातील तिसरा खेळाडू बाद केला असेल‚ त्याने त्वरित खो दिलाच पाहिजे. त्याला नवीन गटातील खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही.

७) संघाच्या शिक्षकाने / व्यवस्थापक किंवा संघनायकाने गुणलेखक नं. २ यांच्यामार्फत मुख्य पंचांकडे खेळाडू बदलास परवानगी मागितली‚ तर ती दिली जाईल. आक्रमणाची पाळी सुरू असणारा संघ कधीही व कितीही वेळा बदली खेळाडू घेऊ शकतो.

संरक्षक संघास संरक्षणासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी बदली खेळाडू घेता येईल. मैदानावर प्रत्यक्ष पळती करणाऱ्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडू घेता येणार नाही. तो बाजूची रेषा ओलांडून बाहेर आल्यावरच बदली खेळाडू मैदानात प्रवेश करेल आणि एक खो दिल्यानंतरच पुढील पाठलाग सुरू होईल.

काही तात्कालिक परिस्थितीत गरज भासल्यास पंचप्रमुख आक्रमकास बदली करण्यास मुभा देईल. त्या वेळी बदलप्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही; परंतु रिकाम्या चौरसात बसेपर्यंत किंवा खो दिल्याशिवाय क्षेत्रात येणारा खेळाडू संरक्षकाचा पाठलाग करू शकणार नाही. मात्र‚ तात्कालिक परिस्थितीत क्षेत्राबाहेर गेलेला आक्रमक परत क्षेत्रात येऊ इच्छित असेल‚ तर त्या वेळी बदलप्रक्रिया पूर्णपणे बंधनकारक राहील.

पंचप्रमुखाने आक्रमक खेळाडूस‘तांबडे कार्ड’ दाखविल्यास संबंधित आक्रमक खेळाडूस बदलण्यासाठी खेळाडू बदलप्रक्रिया बंधनकारक राहील.

८) पाळीची वेळ संपण्यापूर्वी पळती करणाऱ्या संघाचे सर्व खेळाडू बाद झाले‚ तर पुन्हा त्या संघाचे खेळाडू तीन-तीनच्या गटाने पळतीसाठी क्रीडांगणावर येतील. एका पाळीत खेळाडूंचा क्रम बदलता येणार नाही. दुसऱ्या डावात खेळाडूंचा क्रम बदलता येईल. बदलाची नोंद गुणलेखकाकडे करणे आवश्यक आहे.

९) पाठलाग करणाऱ्या संघाला पाठलागाच्या पाळीची वेळ संपण्यापूर्वी खेळ थांबविता येईल. संघनायकाने हात वर करून पंचप्रमुखाला तशी विनंती करावी. पंचप्रमुखाने‘पाळी संपली’ असे जाहीर करेपर्यंत खेळाडूंना आपल्या जागा सोडता येणार नाहीत.

१०) सामना सुरू होताना प्रथम पाठलाग करणारा जो संघ आहे‚ त्याचे पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघापेक्षा सहा ते आठ गुण अधिक झाले असतील‚ तर आपला पाठलागाच्या पाळीचा हक्क राखून ठेवून दुसऱ्या संघास ‘फॉलोऑन’ देता येतो. त्याने फॉलोऑन दिलाच पाहिजे असे नाही. आठपेक्षा अधिक गुणांची आघाडी असल्यास त्याने फॉलोऑन दिलाच पाहिजे.

११) पळती करणाऱ्या संघाच्या प्रत्येक बाद होणाऱ्या खेळाडूगणिक पाठलाग करणाऱ्या संघाला एक गुण मिळतो. सामना संपल्यावर ज्या संघाचे अधिक गुण असतील‚ तो संघ विजयी म्हणून जाहीर करावा.

१२) बाद पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचे समान गुण झाले‚ तर प्रत्येक संघाला पळती व पाठलाग यांची एक-एक पाळी द्यावी. त्यामध्ये अधिक गुण मिळवणारा संघ विजयी म्हणून जाहीर करावा. यामध्येही निकाल लागला नाही‚ तर पुन्हा प्रत्येक संघास एक-एक पाळी द्यावी. पाळी सुरू असताना पळती करणाऱ्या संघाचा पहिला खेळाडू बाद होताच ती पाळी थांबवावी आणि तो खेळाडू किती वेळात बाद झाला‚ त्या वेळेची नोंद पंचप्रमुखाने आपल्या घड्याळाप्रमाणे करावी.

दुसऱ्या संघाच्या पळतीत त्यांचा पहिला खेळाडू बाद होताच पाळी संपवून तो खेळाडू किती वेळात बाद झाला याची पंचप्रमुखाने नोंद करावी. ज्या संघाला प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू बाद करावयास कमी वेळ लागला असेल‚ तो संघ विजयी म्हणून जाहीर करावा.

प्रतिपक्षाच्या नोंदविलेल्या वेळेपेक्षा आक्रमण ३० सेकंदांहून अधिक वाढले‚ तर पंचप्रमुख खेळ थांबवील आणि निकाल जाहीर करील. काही अपरिहार्य कारणामुळे अंतिम सामना पूर्ण खेळवता येत नसेल‚ तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करावे. नाणेफेक करून नाणेफेक जिंकणाऱ्या संघाकडे पहिले सहा महिने ट्रॉफी राहील. त्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी दुसऱ्या संघाकडे ट्रॉफी सुपुर्द केली जाईल.

साखळी पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघास तीन गुण मिळतील आणि पराभूत संघास शून्य गुण मिळेल. सामन्याच्या शेवटी दोन्ही संघांचे समान गुण झाले‚ तर प्रत्येक संघास एक गुण मिळेल.

१३) पंचप्रमुखाने निकाल जाहीर केल्यावर खेळाडूंनी मैदान सोडावे.

१४) अपरिहार्य कारणामुळे सामना मध्येच थांबवावा लागला व तो त्याच सत्रात पुढे सुरू केला‚ तर खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्यात बदल करता येणार नाही. पूर्ण झालेल्या पाळ्या व त्यात मिळविलेले गुण जमेस धरून सामन्याच्या राहिलेल्या पाळ्या खेळल्या जातील. ज्या पाळीत खेळ थांबला असेल‚ ती पाळी पुन्हा सुरुवातीपासून खेळवावी.

१५) अपुरा राहिलेला सामना दुसऱ्या सत्रात खेळवावा लागला‚ तर पूर्ण सामना पुन्हा खेळवावा. या वेळी खेळाडू व सामना अधिकारी बदलले तरी चालेल.

खो खो सामना अधिकारी

सामन्यासाठी एक पंचप्रमुख‚ दोन पंच‚ दोन गुणलेखक आणि एक वेळाधिकारी नेमावा.

खो खो पंचप्रमुखाची कर्तव्ये

  1. सामना सुरू होण्यापूर्वी मैदान व गुणपत्रक तपासणे.
  2. नाणेफेक करणे.
  3. प्रत्येक पाळीनंतर संघाचे गुणपत्रक तपासणे आणि सामना संपल्यावर निकाल जाहीर करणे.
  4. पंचांना आवश्यक ती मदत करणे. दोन पंचांमध्ये निर्णयाबाबत मतभेद असेल‚ तर अंतिम निर्णय देणे.
  5. संपूर्ण सामन्यावर देखरेख ठेवणे.
  6. लघु आक्रमणाच्या डावात वेळेची नोंद ठेवणे.
  7. खेळात हेतुपुरस्सर व्यत्यय आणणाऱ्या किंवा असभ्य वागणाऱ्या खेळाडूस त्याच्या दोषाच्या प्रमाणात ताकीद देणे‚ बडतर्फ करणे किंवा संघ बडतर्फ करणे. ताकीद दिलेल्या खेळाडूचा क्रमांक घोषित करून त्याला पिवळे कार्ड दाखविणे; दोषी खेळाडूस मैदानाबाहेर घालविण्यासाठी तांबडे कार्ड दाखविणे.

खो खो पंचांची कर्तव्ये

  1. क्रीडांगणाच्या बाहेरील राखीव जागेतून खेळ पाहून शक्यतो आपल्या बाजूच्या मैदानावरील निर्णय देणे. आवश्यक असेल‚ तर पंच मैदानातही येईल.
  2. सहकारी पंचास आवश्यक ती मदत करणे.
  3. नियमभंग होताच त्याचे निराकरण करण्यास खेळाडूस भाग पाडणे.
  4. हेतुपुरस्सर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूस पिवळे कार्ड दाखविणे.

खो खो गुणलेखकाची कर्तव्ये

१) गुणलेखक क्रमांक एक हे खेळाडूंच्या नावांची व क्रमांकांची नोंद ठेवतील. पाळीच्या शेवटी आक्रमण करणाऱ्या संघाच्या गुणांची नोंद करतील. सामना संपल्यावर निकाल तयार करतील व गुणपत्रकावर सामना अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतील. निकाल जाहीर करण्यासाठी गुणपत्रक पंच प्रमुखाकडे देतील.

२) गुणलेखक क्रमांक दोन हे संरक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंचा क्रम नोंदवतील. ते बाद झालेल्या खेळाडूंची नोंद ठेवून त्यांना नेमून दिलेल्या जागी बसण्यास भाग पाडतील.

३) बदली खेळाडू घेण्याच्या प्रक्रियेत पंचप्रमुखाला मदत करतील.

खो खो वेळाधिकाऱ्याची कर्तव्ये

  1. वेळेची नोंद ठेवणे.
  2. सरपंचाच्या सूचनेनुसार एक दीर्घ आणि एक लघु शिट्टी वाजवून सामना सुरू करणे.
  3. पाळी सुरू असताना प्रत्येक मिनिट संपल्याची घोषणा करणे.
  4. पाळीची वेळ संपताच दीर्घ शिट्टी वाजवून पाळी संपविणे.

खो खो बेशिस्त / गैरवर्तनाबद्दल शासन

सामना सुरू असताना खेळाडूने गैरवर्तन केले किंवा बेशिस्त वागला‚ तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. अपशब्द वापरणे‚ गैर हावभाव करणे‚ पंचांच्या  निर्णयाविरुद्ध नापसंती किंवा निषेध व्यक्त करणे‚ जाणीवपूर्वक धक्का मारणे‚ गणवेश धरून जोराने तडाखा देणे इ. बाबींचा गैरवर्तनात समावेश होतो.

गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूस ताकीद देऊन पिवळे कार्ड दाखविले जाते. बेशिस्त वर्तनाची त्याच्याकडून पुनरावृत्ती घडली‚ तर लाल कार्ड दाखवून त्याला मैदानाबाहेर काढले जाते. लाल कार्ड दाखवून बाहेर काढलेला खेळाडू त्या सामन्यात पुढे खेळू शकणार नाही. तसेच पुढील एका सामन्यात खेळण्यास त्याच्यावर बंदी घालण्यात येईल.

एका स्पर्धेत दोन वेगवेगळ्या सामन्यांत बेशिस्त व गैरवर्तनाबाबत पिवळे कार्ड दाखविले असल्यास त्या खेळाडूस तो दुसरा सामना संपेपर्यंत खेळू दिले जाईल‚ परंतु त्यापुढील एका सामन्यात त्याच्या खेळण्यावर बंदी घालण्यात येईल.

लाल कार्ड दाखवून खेळाडूस बाहेर काढले जाईल. त्याच्या जागी राखीव खेळाडूंतून बदली खेळाडू घेता येईल. सामना सुरू असताना मार्गदर्शक‚ शिक्षक किंवा संघ व्यवस्थापक यांच्याकडून बेशिस्त वर्तन घडले; तर त्यांना‚ त्यांच्या जागेवरून उठवून प्रेक्षकात बसावे‚ असे पंचप्रमुख सांगतील.

पुढे वाचा:

This Post Has One Comment

  1. Mangalsing valvi

    खो खो खेळ हि एक सांगली माहिती मी वाचली ती खूप छान आहे

Leave a Reply