उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेतील  पहिला दिवस
उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेतील पहिला दिवस

उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेतील पहिला दिवस

ह्या वर्षीची उन्हाळी सुट्टी संपली आणि मी सहाव्या इयत्तेत दाखल झालो. गेल्या वर्षी मी चांगला अभ्यास केला होता त्यामुळे मी आता हुशार मुलांच्या एक तुकडीत गेलो होतो. वर्ग नवा असल्यामुळे मला जरा अवघडल्यासारखे होत होते. शिवाय फारसे कुणी ओळखीचे नसल्यामुळे मी लाजूनच बसलो होतो. तेवढ्यात माझ्या बाजूला एक गोरागोरा मुलगा बसायला आला. त्याने मला नावगाव विचारले, कुठे राहातोस वगैरे विचारले तेव्हा मला जरा बरे वाटले. मीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागलो.

हळूहळू माझी आसपास बसणा-या दोनतीन मुलांशी ओळख होऊ झाली तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि आमच्या वर्गशिक्षिका वैजयंती नाडकर्णीबाई वर्गात आल्या. त्यांनी आम्हा सर्वांची हजेरी घेतली. हजेरी घेताना त्यांना समजले की मी वर्गात नवा आहे. तेव्हा त्यांनी माझी विचारपूस केली. मला पुढे बोलावून नाव सांगायला सांगितले. मी कुठे राहातो, माझ्या घरी कोण कोण आहे ते विचारले. मग सर्व मुलांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. त्यामुळे मला छान वाटले.

दुपारी आम्ही सर्व मुले डबा खायला बसलो तेव्हा मलाही त्या मुलांनी त्यांच्यात घेतले. डबा खाऊन झाल्यावर आम्ही मैदानात खेळायला गेलो तेव्हा मला दोन तुकडीतले माझे जुने मित्र भेटले. त्यांच्याशी बोलल्यावर मला जरा बरे वाटले. पण का कोण जाणे, त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा आल्यासारखे मला वाटू लागले. म्हणजे मी त्यांच्याशी बोलू इच्छित होतो. पण त्यांनाच माझ्याशी बोलायचे नाही की काय असे वाटत होते. त्यामुळे मधली सुट्टी संपल्यावर मी जरासा खिन्न मनानेच वर्गात परतलो.

ह्या नव्या वर्गातले मुलगे खूप बडबड करतात. मला तर भीती वाटत होती की कुणी शिक्षक आम्हाला ओरडतील की काय? पण कुणीच आम्हाला ओरडले नाही. बहुदा सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस म्हणून मुले एवढी बोलत असावीत. अशा त-हेने उन्हाळी सुट्टीनंतरचा पहिला दिवस तरी माझा चांगलाच गेला.

पुढे वाचा:

Leave a Reply