देशभक्तांचे कार्य किंवा मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी

देशभक्ती आणि समाजसेवा ही आजकाल स्वार्थ साधण्यासाठी प्रभावी साधने ठरली आहेत; पण आमचे ‘ आनंदराव देशमाने’ मात्र या नियमाला अपवाद आहेत. देश हाच त्यांचा देव, देश हाच त्यांचा धर्म आणि देश हेच त्यांचे कार्यक्षेत्र! देश म्हणजे नकाशावरच्या रेषा, असे ते मानत नाहीत; तर देश म्हणजे देशातील कोट्यवधी माणसे. देश म्हणजे देशाची भूमी, नदया, डोंगर, सर्व पशुपक्षी आणि अवघी सृष्टीच. या साऱ्यांविषयी आनंदरावांना विलक्षण आत्मीयता वाटते.

आज आनंदरावांचे वय सत्त्याहत्तरीपलीकडे गेले आहे; पण आजही त्यांची कामगिरी ऐन उमेदीतील तरुणाला लाजवणारी आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल अशा अनेक थोर नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यांचे स्फूर्तिदायक विचार त्यांनी ऐकले होते. अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आनंदरावांनी भूमिगत चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला होता

देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या आनंदरावांनी स्वत:चा संसार उभा करण्याचा कधी विचारही मनात आणला नाही.स्वातंत्र्योत्तर काळात आनंदराव सत्तेकडे कधी वळले नाहीत. सेवाभाव हाच त्यांचा धर्म बनला. फाळणीनंतर निर्वासित झालेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते गुंतले.

नंतर आदिवासीमध्ये राहून आदिवासींची वेठबिगारी संपवण्यासाठी ते झटले. त्यांनी निरक्षरांना साक्षर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. आता ते शरीराने थकले आहेत. पण उमदया मनाने ते वृद्धापकाळातही उगवती पिढी घडवत आहेत. बालकांवर सुसंस्कार करण्यात ते मग्न आहेत. बालकांच्या मेळाव्यात आनंदराव स्वातंत्र्यलढ्यातील रोमांचकारी कथा सांगतात. नव्या पिढीतील आम्हा युवकयुवतींच्या मनावर त्यांच्यामुळे देशभक्तीचे संस्कार दृढ झाले आहेत.

सभोवतालच्या निराशजनक वातावरणात आनंदराव म्हणजे एक मोठे आशास्थान वाटते. चंदनाप्रमाणे झिजून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या थोर देशभक्ताला माझे विनम्र अभिवादन !

पुढे वाचा:

Leave a Reply