शिष्टाचार मराठी निबंध – Shishtachar Marathi Nibandh

शिष्ट किंवा सभ्य लोकांचे आचरण म्हणजे शिष्टाचार. दुसऱ्यांशी चांगली वागणूक ठेवणे, घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर करणे, आगत-वागत करणे, गोड बोलणे म्हणजे शिष्टाचार होय. शिष्टाचारामुळे मनुष्य नम्र व आनंदी रहातो. समाजात कसे वावरावे हे ज्यांना माहित असते त्यांचा समाजही आदर करतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याच्यामुळे समाजाला उपद्रव होऊ नये अशीच अपेक्षा असते. शिष्टाचार न पाळणारा मनुष्याकडे लोक तिरस्काराने पहातात.

शिष्टाचाराचे बीज लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवायला हवे. पुढे शिक्षणाने व अनुभवाने त्यात सुधारणा होतात. बालकाचा पहिला गुरु त्याचे आई-वडिल असतात. ते त्याला शिष्टाचाराचे प्राथमिक धडे देतात. शिक्षकांकडून पुढचे शिक्षण मिळते. विनम्रता प्रेमाने बोलणे, कोणाचे वाईट न चिंतणे, मोठयांचा आदर व दुसऱ्यांना मदत करणे या सर्व गोष्टी शिष्टाचाराचाच भाग आहे. शिष्टाचार म्हणजे एक अमूल्य दागिना होय. त्यामुळे मनुष्याचे पूर्णपणे परिवर्तन होते.

मुलांमध्ये या सवयी रुजविण्याचे काम पालक व शिक्षकांचे आहे, अशी मुले पुढे देशाचे भविष्य घडवू शकतात, लोकांमध्ये मिळून-मिसळून रहाण्याने व वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊनही आपण शिष्टाचाराचे धडे घेऊ शकतो. चांगल्या लोकांचा संगतीमुळे आपले विचारही चांगले होतात व शिस्त येते. ,

समाज, ग्रंथालय, शाळा, ऑफिस, सोसायटी या सर्व ठिकाणी वागण्या बोलण्याचे काही नियम असतात. त्यांचे पालन आपण केले पाहिजे. राष्ट्रीय संपत्तीचा नाश न करणे, समाजाचे नियम पाळणे, ग्रंथालयात मोठ-मोठ्याने न बोलणे, पुस्तके न फाडणे हे सर्व शिष्टाचारच आहेत. चांगल्या सवयी अंगी बाणविण्याची पहिली पायरी आहे. शिष्टाचार हे सद्गृहस्थाचे लक्षण आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply