![मानव आणि पर्यावरण](https://marathi18.com/wp-content/uploads/2021/12/मानव-आणि-पर्यावरण.webp)
मानव आणि पर्यावरण मराठी निबंध – Manav Ani Paryavaran Nibandh Marathi
उगवणारा प्रत्येक दिवस मानवापुढे नवनव्या समस्या निर्माण करत असतो. पण या विसाव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीपुढे जी भयावह समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे हा पृथ्विपुत्र हादरून गेला आहे. मानवापुढील ही समस्या मानवानेच निर्माण केली आहे. त्यानेच आपल्या पृथ्विमातेला या संकटात ढकलले आहे.
खरे पाहता, मानव हे निसर्गाचेच अपत्य आहे. निसर्गाच्या कुशीतच मानव मोठा झाला. आपला विकास साधण्यासाठी त्याने याच निसर्गाचा आधार घेतला, आदर्श ठेवला. निसर्गातच त्याने आपले घरकुल निर्माण केले. उंच उंच आभाळाला जाऊन भिडणारी वृक्षराजी पाहून माणसाचे आकाशाकडे लक्ष गेले. आभाळात स्वच्छंद भरारी मारणाऱ्या विहगाकडे पाहून मानवालाही आकाशात विहार करावासा वाटू लागला.
निसर्गाबरोबर सुखात रमलेल्या या माणसाच्या स्वार्थी वृत्तीला पंख फुटले. स्वत:च्या बुद्धिमत्तेचा गर्व झालेला हा माणूस दूरदृष्टी न ठेवता भोवतालच्या निसर्गाचा नाश करू लागला आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला.
माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने औदयोगिक क्षेत्रात खूप प्रगती साधली आहे. स्वत:च्या यशाने उद्दाम झालेल्या माणसाने कारखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा विचार केला नाही. त्यामुळे भोवतालचे वातावरण दूषित झाले. कारखान्यांतील दूषित पाणी नदी – नाले – सागर यांत सोडून दिल्यामुळे सर्वच पाणी खराब होऊ लागले. लोकसंख्या अतोनात वाढल्यामुळे माणूस स्वच्छ हवेला वंचित झाला. माणसाने निर्माण केलेल्या आणि उपभोगलेल्या विविध वस्तूंचा कचरा इतका वाढला की, सुंदर वसुंधरा ओंगळ झाली. स्वत:साठी उंच इमारती उभारण्यासाठी माणसाने प्रचंड वृक्षतोड केली. निसर्गाने दिलेल्या पाण्याचा प्रचंड अपव्यय केला.
मानवाला उपलब्ध असलेली निसर्गसंपत्ती आता हळूहळू संपू लागली आहे. पृथ्वीवरील उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण घटू लागले. ओझोन वायूचे वातावरणातील प्रमाण घटू लागले. हवा, पाणी आणि जमीन यांवरील प्रदूषण वाढले तेव्हा माणूस खडबडून जागा झाला व त्याने ‘वसुधा वाचवा’ ही आरोळी फोडली.
पर्यावरणावरील हे संकट विशिष्ट देशापुरतेच मर्यादित नाही; कारण पर्यावरण हे सर्वांचे आहे. सर्वांना सारखीच दु:खे सोसावी लागत आहेत, हे जाणवले; तेव्हा १९७२ साली संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरणविषयक परिषद स्टॉकहोम येथे भरली व १९९२ मध्ये ब्राझीलमधील रिओ दी जानेरो’ येथे जगातील सारी राष्ट्रे वसुधा वाचवण्याचा विचार करण्यासाठी एकत्र आली, हेही नसे थोडके !
![मानव आणि पर्यावरण मराठी निबंध-Manav Ani Paryavaran Nibandh Marathi](https://marathi18.com/wp-content/uploads/2021/12/मानव-आणि-पर्यावरण-मराठी-निबंध.webp)
पुढे वाचा:
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध