संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी

मानव हा एकटा राहू शकत नाही. पूर्वी जेव्हा तो भटके जीवन जगत असे तेव्हा तो कळपात राहात असे. परंतु मानवाने आपली बुद्धी वापरून नवे नवे शोध लावले आणि स्वतःचे जीवन सुखद केले. अग्नी, चाक आणि शेती हे शोध जेव्हा लावले गेले तेव्हा माणसांचे भटके कळप एका जागी स्थिर राहू लागले आणि त्या कळपांचे मग समाजात रूपांतर झाले. समाज चालवायचा म्हणून मगनीती-नियम आले. त्यातूनच संस्कृती निर्माण झाली.

संस्कृतीमुळे माणसाचे जीवन उन्नत होते. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर अनेक संस्कार केले जातात. हे सगळे संस्कार त्या त्या काळातील प्रचलित संस्कृतीनुसार होतात. संस्कृती बदलली की हे संस्कारही बदलतात. म्हणूनच संस्कृतीची व्याख्या करताना आपण म्हणू शकतो की संस्कृती ही जीवन जगण्याची एक पद्धत असते. शेकडो वर्षांच्या परंपरेतून संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रूजतात. ज्या समाजात मानव जन्म घेतो, ज्या समाजात तो राहातो, त्या समाजाची संस्कृती हीच त्या मानवाची संस्कृती असते.

परंतु संस्कृती ही कधीही स्थिर नसते. काळ बदलतो, तसतशी मानवासमोरची आव्हाने बदलतात. नवनवे वैज्ञानिक शोध लागतात. युद्धे होतात, पारतंत्र्य, गुलामी येते किंवा मग जगावर अधिराज्य करायला मिळते. सहसा जेत्यांच्या संस्कृतीचा जितांच्या संस्कृतीवर परिणाम होतो. आपलेच उदाहरण घ्या ना, पूर्वी आपल्या इथे संस्कृत पाठशाळा होत्या. तेव्हा सर्व समाज वैदिक संस्कृतीने बांधला गेला होता. मुसलमानांचे आक्रमण झाल्यावर मूळची हिंदू संस्कृती बदलली आणि त्यात मुसलमानी संस्कृतीची भर पडली. अनेक अरबी, फारसी शब्द आपल्या वापरात येऊ लागले. आज आपण पाहिले तर हवा, जमीन, तयार,शाब्बास,माफ,खतम,खलास असे कितीतरी अरबी आणि उर्दू शब्द आपल्या भाषेत आलेले आहेत, नव्हे ते आपलेच झालेले आहेत. मुसलमानांनंतर मग इंग्रज लोक आले. तेव्हा आपण इंग्रजी भाषा शिकलो. संस्कृत पाठशाळेत मुलांना न पाठवता इंग्रजांनी काढलेल्या शाळांमध्ये पाठवू लागलो. वाढदिवस साजरा करणे, त्यासाठी केक कापणे, इंग्रजी वर्षअखेरची पार्टी करणे असले रीतीरिवाज आपल्या संस्कृतीत घुसले जे पूर्वी नव्हते. आपण आपले वेषही बदलले. पुरूषांनी तर सर्रासधोतर, सदरा हा वेष टाकून शर्ट आणि पँट हा वेष स्वीकारला. ह्यावरून आपल्याला कळते की संस्कृतीत सारखे बदल होत असतात आणि त्यामुळे समाजातही बदल घडतात.

संस्कृती बदलली की समाज बदलतो आणि समाज बदलला की संस्कृती बदलते हे अगदी उघड आहे. पूर्वीचे समाज बंदिस्त होते, भौगोलिक अंतरामुळे एकमेकांशी संपर्काची काहीच साधने नव्हती. परंतु आता मोबाईल, स्काईप, इंटरनेट आदी साधनांमुळे जग जवळ आले आहे. आता ह्या पुढे वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येऊन त्यांच्यात सरमिसळ होणार आणि नवे समाज निर्माण होणार ही तर अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply