वृक्षसंपत्ती मराठी निबंध – Ruksha Sampatti Marathi Nibandh

परवाच आमच्या वर्गाची सहल बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेली होती. तिथे असलेली हिरवीगार झाडे, झुडपे, त्या झाडांवर फुललेली फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, फळझाडांवरची फळे, झाडांच्या फांद्यात दडलेल्या पाखरांची मंजुळ किलबिल. खरोखर, तिथले वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे सर्वांच्या मनात आगळावेगळा उत्साह दाटून आला. भर उन्हाळ्यात आपण शहरातील डांबरी रस्त्यावरून चालत असतो तेव्हाही मध्येच एखादे झाड आले तर त्याच्या सावलीत किती गारवा वाटतो.

खरोखर, हे वृक्ष.. ही हिरवीगार वनराजी आपले मित्र आहेत. आपले सारे जीवन ह्या वृक्षवल्लरींवर आणि वनस्पतींवरच अवलंबून आहे. झाडे आपल्याला काय देत नाहीत? झाडे आपल्याला अन्न देतात, सावली देतात. झाडे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर सोडून हवा शुद्ध करतात. आपल्या घरातील सामानसुमान लाकडाचे बनलेले असते.

काही ठिकाणी तर घराच्या भिंतीसुद्धा लाकडाच्याच असतात. झाडापासून आपल्याला जळण, लाकूड, फळे, लाख, गोंद, रबर, मध असे नानाविध पदार्थ मिळतात. वेगवेगळ्या फुलांचे आपण गजरे बनवतो, लग्नात आणि अन्य समारंभात सुशोभीकरणासाठी फुलांचा उपयोग होतो. फळांपासून जॅम, मोरंबा, लोणची बनतात. हिरडा, बेहडा, ज्येष्ठीमध, वावडिंग असे अनेक औषधी पदार्थ आपल्याला झाडांपासूनच तर मिळतात. झाडापासून कापूस मिळतो. रेशीम जरी किड्यापासून मिळत असले तरी तो किडा तुतीच्या झाडांच्या पानावरच राहातो.

झाडांमुळे जमिनीची धूप होत नाही. दुष्काळाचे प्रमाण कमी होते, झाडांची मुळे जमिनीला घट्ट पकडत असल्यामुळे पुराच्या वेळेस फार नुकसान होत नाही. एवढेच नव्हे तर मेल्यावरही दहन करण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो. आता हल्ली विद्युतदाहिनीचा वापर कुठे कुठे होऊ लागला आहे म्हणा.

तर ही अशी झाडे.. आपल्याला खूप हवीहवीशी वाटणारी. सुखाची सावली देणारी. घरे बांधताना, रस्ते बांधताना आपल्याला वृक्षतोड करावी लागते तेव्हा त्या बदल्यात दुसरीकडे झाडे लावली पाहिजेत. लावलेली झाडे जगवली पाहिजेत. मला तर वाटते की जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावली पाहिजेत. काही लोक उघडेबोडके डोंगर दत्तक घेतात आणि तिथे वृक्षारोपण करतात. सामाजिक संस्थांनी ह्या बाबतीत पुढे आले पाहिजे. म्हणूनच झाडे ही मानवासाठी कल्पवृक्षासारखीच आहेत.

संत तुकारामांनी अभंगात लिहिले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.’ ते किती खरे आहे.

वृक्षसंपत्ती मराठी निबंध – Ruksha Sampatti Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply