शरद ऋतु मराठी निबंध – Sharad Ritu Essay in Marathi

वर्षा ऋतु संपल्यावर शरद ऋतूचे आगमन होते. अश्विन आणि कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने असतात. या ऋतूत सूर्याची उष्णता प्रखर असते. आकाश निरभ्र असते. पावसाळ्यात दूषित झालेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे शुद्ध होते. शरदाचे चांदणे फार सुंदर असते.

शरद ऋतूत रात्री हवामान थंड पण आल्हाददायक असते. फुलांना बहर आलेला असतो. आकाशात असंख्य तारे चमकत असतात. चंद्राच्या चांदण्यांमुळे अंधार दूर होतो. असे वाटतं जणू संपूर्ण विश्व दुधाच्या सागरात सुस्नात होत आहे.

शरद ऋतूत सरोवरात सुंदर कमळे उमललेली असतात. ज्यावर भ्रमर गुंजारव करीत असतात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट चालू असतो. ते आपले मन आकर्षित करतात. शरीर व मन उत्साही असल्यामुळे काम करावेसे वाटते. फळे आणि भाज्या भरपूर असतात. वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. चेहऱ्यावर आनंद आणि जीवनात प्रसन्नता येते. सगळीकडे उत्साह दिसतो.

दसरा, दिवाळी हे सण याच ऋतूत येतात. लोक अनेक प्रकारची मिष्टान्ने एकमेकांना खाऊ घालतात. आनंदाने हे सण पार पडतात. कार्तिकी पौर्णिमेबरोबरच हा ऋतू संपतो. आणि हेमंत ऋतूच्या आगमनाची सूचना मिळते.

सर्वत्र बहरली फुलझाडे
उमलली सरोवरी कमळे
गुंजारव करीत भ्रमर फिरे
मम चित्त बहु प्रसन्न झाले
शरद ऋतु हा कधीच न जावा
असे मनापासूनी वाटे॥

शरद ऋतु मराठी निबंध – Sharad Ritu Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply