वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी – Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi

प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आज ही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. वृक्ष केवळ आपले जीवनच प्रभावित करतात असे नव्हे ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्षांपासून आपणास इंधन, इमारती लाकूड, चारा, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचेही काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनीची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमिनींचा ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो. हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू, साल, साग इत्यादी वृक्ष आढळतात. अशा वृक्षांपासून आपल्याला इमारती, जहाजे इ. साठी लाकूड मिळते तसेच निसर्गाचा समतोलही राखला जातो.

औषधे तयार करण्यासाठी वृक्षांची फुले, फळे, साल, पाने, मुळे, बिया या सर्वांचा उपयोग केला जातो. स्वादिष्ट फळे, सुगंधित फुले, वस्त्र, इंधन, घर यासाठी मानव आजही वृक्षांवरच अवलंबून आहे. वृक्ष व पशूपक्षी हे परस्पर पर्यायी आहेत. जिथे वृक्षांची हिरवीगार वनराई असते तेथेच पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पक्षी वृक्षांवर घरटे बनवितात. वृक्ष आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच कार्बनडायऑक्साईडसारखे विषारी वायू शोषून घेऊन आपणास प्राणवायू देतात. दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या या वृक्षांमधे प्रदूषण कमी करण्याची अद्भुत क्षमता असते. वातावरण सुरक्षित, थंड, सुगंधित करण्यासाठी वृक्षांची सधनता उपयोगी ठरते.

वृक्षांचे तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते, फुलझाडे, सावली देणारे वृक्ष, फळझाडे या सर्व प्रकारच्या वृक्षांचा एकच उद्देश आहे, मानवाचे कल्याण करणे वृक्ष आपल्या सभोवतालचा परिसर सुंदर करतातच पण वातावरणही सुगंधित करतात. त्यामुळे शांती आणि आनंद वाटतो. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून आपल्याला सावली देतात. वनांपासून आपल्याला डिंक, लाख, कागद, रबर या नित्योपयोगी वस्तू मिळतात.

असे असूनही आज मानव रोज झाडे तोडत राहतो. पण तीच झाडे पुन्हा लावत नाही. हिरवीगार जंगले त्याने उजाड करून टाकली आणि त्यामुळे पर्यावरणाची भयंकर समस्या आपल्यासमोर उभी राहिली. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवनदाते आहेत म्हणून आपण जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत. त्यामुळे दुष्काळ आणि वाळवंटीकरणासारख्या समस्या नष्ट होऊ शकतील.

वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी – Vriksharopan Kalachi Garaj Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply