Set 1: वेळेचा सदुपयोग मराठी निबंध – Velecha Sadupyog Marathi Nibandh

इंग्रजीत असे म्हटले आहे की टाईम इज मनी. हिंदीतही म्हणतात की कल करसो आज कर, आज करेसो अब. खरोखरच हातचा वेळ हा एकदा गेला की परत येत नाही. समयाच्या वाटेवर फक्त एकेरी वाहतूकच असते. काळ हा नेहमी पुढेच जातो. तो मागे कधीच येत नाही. म्हणूनच तर समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले आहे की ‘घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा. आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा ना?’

आपला जन्म होतो, जन्मानंतर काही काळाने आपण बोबडे बोलू लागतो, चालू लागतो, धावू लागतो, असे होता होता आपले बाळपण संपले कधी तेही कळत नाही. मग आपण तारूण्यात प्रवेश करतो. काही काळाने लग्न होते, संसार सुरू होतो, मुलेबाळे होतात. काळ पुढे धावतच असतो. मग तीच मुले मोठी होतात, त्यांची लग्ने करण्याची वेळ येते तेव्हा कुठे आपल्याला कळते की आपल्या हातून काळ निसटून चालला आहे. आपणास बरेच काही करायचे होते परंतु त्यातले आपण काहीच केले नाही किंवा करू शकलो नाही.

म्हणूनच वेळच्या वेळी सर्व गोष्टी करणे फार महत्वाचे असते. बाळपणी बुद्धी कुशाग्र असते तसेच तेव्हा इतरही काही व्यवधाने नसतात म्हणूनच मुलांनी शिकायच्या वयात शिकले पाहिजे. आवडत्या विषयात उच्च शिक्षण घेतले पाहिजे. मेहनत करण्यास पर्याय नसतो, आडमार्गाने जाऊन यश मिळाल्यासारखे वाटले तरी ते यश क्षणिक असते. शिक्षण पूर्ण केल्यावर आपल्या आवडत्या व्यवसायात काम करावे. काम जर आवडीचे असेल तर त्यासाठी घेतलेले कष्ट हे कष्ट वाटत नाहीत.

उगाचच आळसात वेळ वाया घालवू नये. दुस-याची निंदा करण्यात, दुस-यावर जळण्यात आणि नस्त्या उचापत्या करण्यात वेळ फुकट जातो. अशा नकारात्मक कामामुळे आपली उर्जाही वाया जाते. म्हणून वेळेचा सदूपयोग करावा. रोज योग्य झोप घेणे, आराम करणेही आवश्यक आहे. परंतु आराम न करता टीव्ही बघणे किंवा मोबाईलवरचे मेसेजेस वाचत बसणे म्हणजे आराम करणे नाही.

वेळच्या वेळेस अभ्यास केला असेल तर परीक्षेच्या वेळेस ताण येत नाही. कचेरीत नीट काम केले असेल तर डेडलाईनची भीती वाटत नाही. दुखतखुपत असेल तर वेळच्या वेळेस डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजेत. त्यात हयगय केल्यास प्रसंगी रडत बसण्याची वेळ येते. परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश घेण्याची अंतिम तारीख, आगगाडीने प्रवास करण्याची वेळ, आयकराचे विवरण भरण्याची वेळ ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच करून घ्याव्या लागतात. अन्यथा पस्तावण्याची वेळ येते. म्हणूनच लक्षात ठेवावे की वेळेवर काम केले की आपले पुढील विनाकारण कष्ट वाचतात आणि मनःशांतीही मिळते.

Set 2: वेळेचा सदुपयोग मराठी निबंध – Velecha Sadupyog Marathi Nibandh

“उद्याचे काम आज करा. आजचे काम आत्ता करा”

मानवी जीवनात काळाचे फार महत्त्व आहे. काळाची योग्य ओळख होणे हाच काळाचा सदुपयोग आहे. काळ गतिमान आहे. काळाबरोबर चालणे प्रगती आणि थांबणे मृत्यू आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण बहुमूल्य असतो. काळ रथचक्राप्रमाणे सतत धावतच असतो. कुणालाही तो थांबविता येत नाही. तो कुणाची वाट पाहत नाही. ज्याप्रमाणे तोंडून निघालेले शब्द परत घेता येत नाहीत, तोडलेले फूल झाडाला पुन्हा जोडता येत नाही, शेत वाळून गेल्यावर पावसाचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे वेळ निघून गेली की कोणत्याही कामापासून काही फायदा होत नाही. वेळेचे महत्त्व न समजल्यास किंवा वेळ निघून गेल्यास त्याचे भयंकर परिणाम होतात. वेळेचे नियोजन करुन त्यांचा पुरेपुर उपयोग करून घेणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. विद्यार्थी जीवनात तर त्याचे विशेष महत्त्व आहे. जो विद्यार्थी अभ्यासाचा वेळ खेळण्यात घालवितो तो एकतर नापास होतो किंवा भविष्यात यशस्वी होण्याची आशा मावळून जाते. जो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो त्याला चांगले गुण मिळतात आणि तो सतत प्रगती करीत राहतो. असा विद्यार्थीच नेता, तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर इ. बनून राष्ट्राच्या प्रगतीस मदत करतो.

वेळेची उपेक्षा केल्यास व्यक्ती अकर्मण्यशील बनते. जी व्यक्ती काळाबरोबर चालते तिच्या पायाशी लक्ष्मी येते. आयुष्यभर कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. याउलट जी व्यक्ती आळशी असते ती वेळेवर काम करीत नाही म्हणून दरिद्रीच राहते.

प्रगतिशील राष्ट्रांच्या प्रगतीचे मूळ कारण वेळेचा सदुपयोग करणे हेच आहे. व्यक्ती वेळेचा सदुपयोग करून प्रत्येक गोष्ट स्वत:ला अनुरूप अशी करून होते. ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाला लोहार पाहिजे तसा आकार देऊ शकतो. त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणारास जगातील दुर्मिळ गोष्टीसुद्धा सहजपणे मिळतात.

वेळेचा सदुपयोग मराठी निबंध – Velecha Sadupyog Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply