माझा आवडता थोर समाजसुधारक मराठी निबंध – Maza Avadta Samaj Sevak Marathi Essay

आपल्या देशात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले. आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी नाना प्रयत्न केले. आपल्या थोर कार्याने ते अमर झाले. पितामह दादाभाई नौरोजी, लो. टिळक, आगरकर, लाला लजपतराय यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल कामगिरी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशातील गरीब बांधवांसाठी थोर प्रयत्न केले.

डॉ राजेंद्रप्रसाद तर पहिले राष्ट्रपती म्हणूनच संबोधले जातात. नवभारताचे निर्माते पंडित नेहरु, रविंद्रनाथ टागोर, जमशेटजी टाटा तसेच दलितांचे कैवारी डॉ. आंबेडकर यांनी देशामध्ये एकी घडवून आणली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गोखले, आगरकर हे आपल्या देशाचे थोर हितचिंतक म्हणून नावाजले गेले. या सर्वांपेक्षा निराळे भासणारे असे महात्मा जोतीराव फूले हे होते. यांनी सवर्ण लोकांपेक्षा अस्पृश्य लोकांच्या कल्याणाकरिता अधिक धडपड केली. अशिक्षित लोकांना साक्षर करण्याचे थोर कार्य जोतीराव फुले यांनी केले. त्यासाठी आत्मबलिदान करण्याची देखील त्यांची तयारी होती. सवर्ण लोक व अस्पृश्य यांचे मिलन घडवून आणणे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याइतके अवघड काम देखील त्यांनी सहजतेने पार पाडले.

एके दुपारी उन्हाचा तीव्र चटका बसत असताना देखील काही महार बायका, पुरुष रिकामी मडकी घेऊन पुणे शहरात पाण्याची भीक मागत हिंडत होते. लोकांच्या हातापाया पडत होते. तहानेने त्यांचा जीव, व्याकुळ होऊन गेला होता, जवळच एका हौदावर लोक स्नान करत होते. बायका धुणीभांडी करत होत्या. पण या गरीब बापड्यांकडे लक्ष कोण देणार ? ते बिचारे व्याकूळ होऊन थेंबभर पाण्याची अपेक्षा करीत दीनपणे, आशेने पहात होते. पण लक्ष देण्यास कोणी तयार नव्हते. अशा वेळी एक गृहस्थ त्या रस्त्यावरुन जात होते. त्यांनी त्या दीन लोकांची अवस्था पाहिली: त्यांना दया आली हे पाहून ते पुढे गेले. एकाच्या हातातील बादली ओढून घेऊन त्यांनी हौदातील पाण्याने त्याला भरुन दिली. एवढेच नव्हे तर आपल्या घराजवळील हौदातील पाणी घेवून जाण्याची परवानगी दिली. हेच थोर गृहस्थ म्हणजे जोतीराव फुले. गरिबांचे दु:खयातना पाहून ते दुःखी व्हायचे गरीबांवर झालेला अन्याय त्यांना खपत नसे.

जोतीराव कनवाळू तसेच बाणेदार व तडफदार होते. अशाच एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी देशबांधवांना बरोबर धडा शिकविला. जेव्हा आपल्या देशांवर इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचे राज्य होते. त्यावेळी तिचा मुलगा पुण्यास आला. त्याचा योग्य सत्कार करण्याचे देशबांधवांनी ठरविले. समारंभास बडे बडे सरदार जहागिरदार उपस्थित होते. फक्त जोतीराव फुले अनुपस्थित होते. सरते शेवटी ते आले ते साध्या वेषात. डोक्याला फाटके मुंडासे, खांद्यावर घोंगडी आणि पायात फाटक्या वहाणा. गरीब शेतकऱ्याच्या वेषात ते सभेला आले. त्यांना आपल्या देशात कशी गरीबी आहे हे पाहुण्यांना दाखवायचे होते. त्यांनी तडफदारपणे सांगितलेही आमचीही गरीबी हटविण्यास फक्त पर्याय आहे आणि तो म्हणजे साक्षरता.

देशाला सुशिक्षित केले पाहिजे, योग्य शिक्षण दिले पाहिजे त्यासाठी प्रथम त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. तसेच दलित वर्गातील . मुलींना शिक्षण देण्याची त्यांनी सोय केली. पुण्यातील मुलींची शाळा हे त्यांच्या यशाचे फलित आहे. समाजसेवेचा सर्वात मोठा वाटा त्यांनीच उचलला. म्हणून ते ‘महात्मा फूले’ या थोर नावाने ओळखू लागले व कर्तृत्वाने अमर झाले.

माझा आवडता थोर समाजसुधारक मराठी निबंध – Maza Avadta Samaj Sevak Marathi Essay

पुढे वाचा:

Leave a Reply