प्रार्थना चे महत्व मराठी निबंध – Prarthaneche Mahatva

प्रार्थना मनुष्याच्या श्रेष्ठत्त्वाचे प्रतीक आहे. कारण यामुळे मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील निकट संबंध स्पष्ट होतो. प्रत्येक धर्मात प्रार्थनेचे खूप महत्त्व आहे. सर्व धर्म गुरूंनी, धर्म ग्रंथांनी, संतांनी प्रार्थनेवर फार जोर दिला आहे. प्रार्थनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रार्थनेत परमेश्वराची स्तुती, गुणगान, आभार, मदतीची अपेक्षा, मार्गदर्शनाची , इच्छा, दुसऱ्यांच्या हिताचे चिंतन आदी असते. प्रार्थना मौन राहून, तोंडाने अन्य प्रकारे करता येते. ती एकट्याने किंवा सर्वांच्या बरोबर करता येते. ही ध्यानाच्या रूपात वा एखाद्या धर्मग्रंथाच्या वाचनाच्या रूपातही करता येते.

प्रार्थनेत जपमाळ, जप, गुणगान, पूजा, संगीत आदींचा आधार घेतला जातो. असे कोणतेही साधन नसले तरी प्रार्थना करता येते. प्रार्थना करण्याची कोणतीही रीत आपण वापरू शकतो. सर्वच पद्धती श्रेष्ठ आहेत. प्रार्थना एक प्रकारे परमेश्वर आणि भक्तामधील संवाद आहे. यात भक्त ईश्वरासमोर आपली सगळी स्थिती स्पष्ट करतो. काहीही लपवीत नाही. प्रार्थनेत जितका खरेपणा, सफाईदारपणा, तन्मयता आणि समर्पणाची भावना असेल तितकी ती प्रभावी होते. प्रार्थनेला वेळ काळाचे, ठिकाणाचे बंधन नाही. ती कुठेही करता येते. प्रार्थनेचे ठिकाण शांत, स्वच्छ, मनोहर व खुले असावे, जेथे मन एकाग्र होऊ शकेल. मंदिर, मशीद, चर्च यासाठी चांगली ठिकाणे मानली जातात. निसर्गाच्या सान्निध्यात प्रार्थना केल्यास अधिक शांती मिळते.

प्रार्थनेत बल, विश्वास, प्रेरणा, आशा आणि योग्य मार्गदर्शन मिळते. असे करण्यामुळे दुर्गुणांचा नाश होतो आणि दया, अहिंसा, ममता, परोपकार, सहिष्णुता, सहकार्य, साधेपणा, उच्च विचार इ. निर्माण होतात. त्यांचा विकास होतो. अडचणी, निराशा, संकटाच्या वेळी प्रार्थनेमुळे बळ आत्मविश्वास आणि शांती मिळते.

प्रार्थनेमुळे समस्या सुटतात, शक्ती मिळते. दु:ख नष्ट होते, अंध:कारात प्रकाश दिसतो. मनाला शांत करण्यासाठी, बुद्धी एकाग्र करण्यासाठी, आत्मविश्वास मिळविण्यासाठी हे अलौकिक साधन आहे. प्रार्थनेच्या बळावर साधू, संत प्रेषितांनी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. ते म्हणत आपला दिवस प्रार्थनेपासून सुरू करावा. दिवसाचा शेवटही प्रार्थनेनेच करावा. महात्मा गांधी प्रार्थनेला खूप महत्त्व देत, दररोज संध्याकाळी त्यांच्या आश्रमात सामुदायिक प्रार्थना होत. प्रार्थनेमुळे माणसाला आपण किती क्षुद्र आहोत हे कळते व त्यामुळे तो नम्र बनतो असे त्यांचे मत होते.

प्रार्थना चे महत्व मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply