भारतीय लोकशाही निबंध मराठी – Bhartiya Lokshahi Nibandh Marathi

आपला भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना कशी असावी हे ठरवण्यासाठी डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. ह्या समितीत थोर विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम केले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. ह्या राज्यघटनेनुसार आपला भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून २६ जानेवारी, १९५० रोजी उदयास आला. त्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

लोकशाही ही सर्व जगात सर्वोत्तम शासनप्रणाली आहे असे मानले जाते. देशात लोकशाही असणे हा नागरिकांना मिळालेला खूप मोठा हक्क आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ते बलिदान आपण व्यर्थ जाऊ देता कामा नये. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले सरकार असते. आम्हाला आमचा देश प्रगतीपथावर न्यायचा आहे. सर्व भारतीयांची प्रगती करायची आहे. प्रजासत्ताक दिन हे त्याचेच प्रतिक आहे.

विविधतेतून एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक वंश, अनेक भाषा अशा वैविध्याने आपला देश नटला असला तरी सर्वांना जोडणारा संस्कृतीचा एक समान धागाही आहे. त्यामुळे एवढ्या विभिन्न समाजगटांना एकत्र बांधून ठेवायचे असले तर आपल्याला लोकशाही राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एवढ्या वर्षांनी आता आपण केले ते योग्यच केले असे सिद्धही झाले आहे.

आज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. इथे अठरा वर्षांवरील सर्व स्त्रीपुरूषांना मतदानाचा अधिकार आहे. कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि वृत्तपत्रे हे लोकशाहीचे चार महत्वाचे स्तंभ आहेत. भारतात हे चारही स्तंभ मजबूत आहेत. विरोधी पक्ष लोकशाहीत महत्वाची भूमिका बजावतात. कायदे बनवण्यात आणि त्यांना मंजुरी देण्यात त्यांचाही मुख्य सहभाग असतो. वृत्तपत्रे कार्यक्षम असली तर लोकशाही पारदर्शक बनते. लोकशाहीत न्यायालयांची भूमिकाही महत्वाची असते. त्यांचे स्वातंत्र्य सर्वोच्च असते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायदानात कुणीही म्हणजे अगदी कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.

आज आपल्या लोकशाहीपुढे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशिक्षितपणा, भ्रष्टाचार, जातीभेद, धार्मिक तेढ, दांभिक राजकारणी, घराणेशाही ह्यांमुळे आपल्या लोकशाहीला पोखरून टाकले आहे. आत्तापर्यंतची आपली वाटचाल समाधानकारक झाली असली तरी लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ह्यापुढेही अथक प्रयत्न करावे लागतील ह्यात काहीच शंका नाही.

भारतीय लोकशाही निबंध मराठी – Bhartiya Lokshahi Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply