भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध – Bhukamp Grastache Manogat

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात ३० सप्टेंबर, १९९३ रोजी भल्या पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र झटका बसला. हा झटका ६.२ रिश्टर स्केल एवढा मोठा होता. शिवाय पहाटेच्या वेळेस लोक गाढ झोपेत असल्याकारणाने जीवितहानीही पुष्कळ घडून आली. कित्येक कुटुंबेच्या कुटुंबे काळाने आपल्या पडद्याआड ओढून नेली. मागे उरलेल्या लोकांची दुःखाने अगदी दशादशा झाली.

किल्लारी हेच माझेही गाव आहे. भूकंपाचा हा प्रसंग घडला तेव्हा त्या प्रसंगात माझे वडील आणि मोठा भाऊ दोघेही मृत्युमुखी पडले. आमच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून फक्त आई, ताई आणि मी असे तिघे वाचलो. मी तेव्हा फक्त सहा वर्षांचा होतो. मला कळत तर काहीच नव्हते. फक्त आईने फोडलेला हंबरडा, मोडून पडलेले घर, बाबा आणि दादांचे जखमीचेहरे एवढेच काय ते आठवते.

भूकंपाच्या वेळेस मोकळ्या जागेत जायचे असते. आईच्या हातांना आम्ही दोघे लागलो म्हणून ती आम्हाला घेऊन बाहेरच्या अंगणात धावली म्हणूनच आम्ही तिघे वाचलो. परंतु आपण वाचलो म्हणून आनंद करायचा की सर्वस्व गेले म्हणून दुःख करायचे तेच कळत नव्हते. आमच्या गावातील बरीच घरे पडली होती. तशा टोलेजंग मोठ्या इमारती फारशा नव्हत्याच. भूकंपाची तीव्रता आणि तो होण्याची वेळ मध्यरात्रीची असल्यामुळे एवढा विध्वंस घडून आला होता. पुष्कळ माणसे ढिगा-यांखाली अडकून मेली होती किंवा जखमी झाली होती.

लौकरच सा-या देशभर ही बातमी पसरली. लौकरच अग्निशमन दलाचे आणि अन्य सरकारी लोक धावून आले. तंबू आणि राहुट्या उभारण्यात आल्या. जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. माझ्या आईच्या खांद्याला मार लागला होता तर ताईच्या पायाला मुका मार लागला होता.. मी खूप लहान असल्यामुळे त्यांच्या बाजूला बसून होतो. आईला जराही नजरेआड होऊ देण्याची माझी तयारी नव्हती.

दुस-या दिवशीपासून मदतीचा ओघ सुरू झाला. ब-याच समाजसेवी संस्था आणि परोपकारी लोक आमच्या इथे आले. सोबत आणलेले अन्न, औषधे आणि कपडे ते गरजूंना देऊ लागले. आम्हा घाबरलेल्या मुलांना त्यांनी धीर दिला. आम्हाला मानवतेचे दर्शन घडत होते.

नंतरच्या काळात सरकारने आम्हा भूकंपग्रस्तांना घरे बांधून दिली. सध्या मी आणि माझी आई एका छोट्याशा घरात राहातो. जवळच्या घरात राहाणारी माझी काकू भूकंपात गेली होती परंतु काका मात्र होते. त्यांच्याकडे आईने आमच्या वाटणीची जमीन मागितली. परंतु ते सहजासहजी वाटणी द्यायला तयार नव्हते परंतु आमची आजी खमकी होती त्यामुळे केवळ आम्हाला आमच्या वाटणीची जमीन मिळाली.

तेव्हापासून आमच्या आईला सतत कष्टच करताना आम्ही पाहिले आहे. आम्हा दोघांना वाढवून चांगले मोठे करायचा तिने ध्यासच घेतला होता. आज मी शिकलो, शेतकी पदवीधर झालो. शेतात नवे नवे प्रयोग करतो. आमच्या शेतावरचे उत्पादन परदेशी पाठवतो. माझ्या ताईचे लग्न झाले. तिला चांगले सासर मिळाले. हे सगळे आईच्या कष्टांचे फळ आहे.

तो भूकंप आम्ही कधीही विसरणार नाही.

भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply