पर्यटन निबंध मराठी – Paryatan Marathi Nibandh

हल्ली आपल्या भारतातील लोक फिरायला खूप बाहेर पडू लागले आहेत. काश्मीर, कन्याकुमारी, ताजमहाल, जयपूर, केरळ, महाराष्ट्रातील किल्ले, अंदमान असे भारतातले भाग तर ते पाहातातच. परंतु केवळ भारतच नव्हे तर युरोप, अमेरिका, सिंगापूर, मलेशिया, दुबई इत्यादी देशही लोक हौसेने पाहू लागले आहेत. तेही देश फिरून संपले की जरा वेगळे देश म्हणून ते इजिप्त, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांना जाऊ लागले आहेत. ह्यामुळेच हल्ली आपल्या देशात आणि परदेशातही पर्यटन उद्योगाचा चांगला विकास झाला आहे. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळते. लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते, पर्यायाने देशाचाही विकास होतो.

‘केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार, ग्रंथ शास्त्र विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार,’ असे आपल्या मराठीत रामदास स्वामींनी म्हणून ठेवले आहे ते अगदी यथार्थच आहे. आपण कामानिमित्त, मनोरंजनानिमित्त किंवा अन्य सामाजिक कारणांनिमित्त प्रवास करीत असतो. प्रवासातील अनुभवांनी आपल्याला खूप काही शिकायला मिळते. गाडी बंद पडण्यासारख्या अनपेक्षित समस्याही समोर अचानकपणे उभ्या राहातात. प्रवासात आपल्याला नेहमीच सतर्क आणि सावध राहावे लागते. तसेच वेगवेगळ्या लोकांचे स्वभावही समजतात. चांगलेवाईट ह्यातील फरक समजतो. व्यापार आणि व्यवसाय कसा करावा हे समजते. आपण निसर्गाच्या जवळ जातो. आपले व्यक्तिमत्व सुधारते. वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. एकुणच प्रवास केल्यामुळे आपल्या अंगी व्यवहारचातुर्य येतेह्यात काहीच शंका नाही.

हल्ली लोकांना हौसेने पर्यटन करायला फार आवडू लागले आहे कारण एकुणच कुटुंबे छोटी झाल्याने आणि सगळेच कामात व्यस्त असल्याने दुसरीकडे कुठे जाण्यासारखी ठिकाणे फारशी नसतात. त्यातून त्यांना कंपनीतून फिरण्यासाठी प्रवास भत्ता सवलत मिळते. शिवाय हल्ली पर्यटनकंपन्याही पुष्कळ निघालेल्या आहेत. तसेच विमाने, आगगाड्या, हॉटेले अशा सर्व सोयीसुविधाही वाढल्या आहेत. ऑनलाईन बुकींगही करता येत असल्यामुळे लोक फिरायला बाहेर पडतात.

अधिक प्रवास करणारी व्यक्ती अधिक माहितगार होते, अधिक लोकप्रिय आणि बुद्धिमान होते. विद्यार्थ्यांनी तर प्रवासाची प्रत्येक संधी घेतली पाहिजे. शाळांनीही शैक्षणिक सहली आयोजित करून मुलांना किल्ले, लेणी, जुनी ऐतिहासिक मंदिरे दाखवली पाहिजेत, तसेच जंगलात वगैरे नेऊन त्यांची निसर्गाशी ओळख करून दिली पाहिजे. मध्यंतरी पुण्यातील काही विद्यार्थ्यांना पालघर येथे समुद्र किना-यावर सहलीला नेले असता ती समुद्रात वाहून गेली. अशा दुर्घटनेपासून वाचण्यासाठी मुलांनीच स्वतः सावधगिरी बाळगली पाहिजे. शिक्षकांचे ऐकले पाहिजे. परंतु दुर्घटना घडतात म्हणून विद्यार्थ्यांना सहलीस न नेणे हा काही उपाय होऊ शकत नाही.

प्रवासाचे फायदे मिळण्यासाठी कान, डोळे आणि मन उघडे ठेवून वावरावे. शिकण्याची इच्छा मनात ठेवावी. म्हणजे मग आपण आपले आयुष्य भरभरून जगले ह्याचा आनंद निश्चितच मिळतो.

माझे आवडते ठिकाण – पर्यटन निबंध मराठी – Paryatan Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply