वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध – Vartaman Patra Band Zali Tar Marathi Essay

किती दुर्दैव ! वर्तमानपत्रे नसती तर ! वर्तमानपत्रे नसती तर ही कल्पनाच नकोशी वाटते. वर्तमानपत्रे आपल्या म्हणजे समाज, पुढारी, गरीब, श्रीमंत यांच्या जीवनाचा आरसाच आहे. समाजातील प्रत्येक घटनांचा, घडामोडींचा साक्षीदार असणारे माध्यम. कोत्या, ढोंगी लोकांना भीतीप्रद वाटणारा पण सज्जन कर्तव्यतत्पर घटकांना गौरवास्पद असणारा पेपर एक दिवस उशीरा आला तरी बेचैन होते.

खूपच व्यस्त असणाऱ्या लोकांना मुद्दामच नाष्त्याला बसवणारा, जीवनात दोन मिनिटे स्थिरावू शकणारा पेपर जर नसेल तर जीवनच नीरस बनेल. देशादेशातील मैत्री, शत्रुत्व यांचे नाते सांगणारा, घरी बसुन जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती सांगणारा पेपर नसेल तर चूकल्यासारखे वाटते. कोणत्या देशाचे कोणाशी किती संबध आहेत. कुठे अपघात, खून मारामाऱ्या त्याचबरोबर देशातील सर्व अर्थ व्यवहाराचा आढावा सविस्तरपणे वर्तमानपत्रातुनच मिळतो.

मनोरंजन, बौद्धिक लेख, पुढाऱ्यांच्या हालचाली, विचार स्पष्टपणे तोच सांगतो कोणत्या मंत्र्यांचा दौरा, कुणाचा राजीनामा लाचलुचपत कुठे अतिरेकी हल्ले अथवा युद्धजन्य पारिस्थितीची सखोल माहिती यातूनच समजते. कोणत्या देशाने अंतराळयान अवकाशात पाठवले, कोण शास्त्रज्ञ काय शोध लावतात, हवामानाचा, तपमानाचा आढावा सांगणारे ते वर्तमानपत्रच. कोणत्या व्यक्तीचा सत्कार, कोणाचे उपोषण, कुणाचे संप, बंद मोर्चे हे पेपरमधूनच प्रसारित होतात.

नवीन रोग कुठे पसरला व महापूर, भुकंप कोणत्या देशात, भागात आहे. कोणता भाग अवर्षणाशी सामना करत आहे याचा उल्लेख पेपरमधूनच येतो. दहावी, बारावी बोर्डाच्या तारखा, बदलणारे अभ्यासक्रम, वाचकांशी हितगुज वर्तमानपत्रातूनच होते. सर्वसामान्य माणसाला आपले विचारस्वातंत्र्य देण्यात अग्रेसर असणारे वर्तमानपत्र समाजमनाचा चष्माच आहे. घोटाळे, लाचलुचपती उघडपणे समाजापुढे आणणारे हे वर्तमानपत्रच, सकाळी चहाबरोबर तोंडी लावत किंवा प्रवासातील थकवा कमी करत, गप्पांना विषय देणारे ते वर्तमानपत्रच.

कोणत्या राज्यात कोणते सरकार आहे, निवडणुकांचे निकाल, आकाशवाणी, दुरदर्शनचे कार्यक्रम प्रसारण एवढेच नाही मुलांना भवितव्यातील करिअर विषयी माहिती तर पुरवतेच पण दहावीच्या अभ्यासक्रमाविषयी, प्रश्नप्रत्रिकांच्या स्वरुपाविषयी सखोल ज्ञान देणारे ते वर्तमानपत्रच. निरनिराळ्या कथा, लेख, मौलिक विचारधन पुरवतेच पण खोट्याचे खरे व खऱ्याचे खोटे करणाऱ्यांना सन्मार्गावर आणते.

लहानांपासुन थोरांपर्यंत आपल्या मातृभाषेतुन प्रसारित होणारे वर्तमानपत्र नसते तर जीवन कंटाळवाणे झाले असते. लोकांच्या चर्चा, गप्पा जमल्या नसत्या. निरनिराळ्या ठिकाणी वाचनालयाच्या निमित्ताने एकत्र येणारे लोक बाहेर पडलेच नसते. ज्ञानाचा प्रसार झालाच नसता जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, निरनिराळ्या खेळांचे समालोचन लोकांपर्यंत पोहोचलेच नसते. संसर्गजन्य रोगांचे ज्ञान न पोहोचल्याने अनेक लोक रोगांचे बळी ठरले असते. देशात काय घडते आहे. कुणा मंत्र्याचे भाषण कुठे आहे समजलेच नसते.

अधंश्रध्दा निर्मूलनाचे कामही वर्तमान पत्रच करते. समाजसुधारणा करण्याचे पहिले अस्त्र आणि शस्त्र म्हणजे वर्तमानपत्रच. वर्तमानपत्र नसते तर देशाच्या निरनिराळ्या प्रदेशाची, सहलींची प्रवासवर्णने वाचता आली नसती. एकमेकांशी संपर्क करणे गैरसोईचे झाले असते. त्यामुळे वर्तमानपत्रे बंद होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध – Vartaman Patra Band Zali Tar Marathi Essay

पुढे वाचा:

Leave a Reply