Set 1: मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi

‘मराठी असे आमुची मायबोली’ असे कवी माधव जूलियन मोठ्या अभिमानाने सांगतातं आणि तिला राज्यभाषा बनवण्याचे स्वप्न पाहतात. १९६० साली त्या महान कवीचे हे स्वप्न साकार झाले. ‘महाराष्ट्र‘ राज्य निर्माण झाले आणि मराठी ही या महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा झाली.

मातृभूमी आणि मातृभाषा यांबद्दल रास्त अभिमान प्रत्येकालाच असतो. माणूस बहुभाषी झाला, तरी सुखदुःखात त्याच्या मुखातून सहजपणे शब्द उमटतात ते त्याच्या मायबोलीतीलच. परदेशांत अन्य भाषिकांच्या गर्दीत वावरत असताना आपल्या मायबोलीतील शब्द कानांवर पडले, तर सासुरवाशिणीला माहेरचे माणूस भेटावे, तसा आनंद होतो व तो अवर्णनीय असतो.

आमच्या मायबोलीला – मराठीला- थोर प्राचीन परंपरा आहे. नवव्या शतकात मराठीत लिहिलेला शिलालेख ‘ श्रवणबेळगोळ ‘ला आढळतो. तेराव्या शतकात ‘ज्ञानेश्वरी’सारखा तत्त्वज्ञानात्मक काव्यग्रंथ मराठीत लिहिलेला आढळतो. या ग्रंथात ज्ञानदेवांनी मराठीची महती अनेक ओव्यांतून वर्णिली आहे. ‘माझा मराठाचि बोलू कौतुके । अमृतातेही पैजा जिंके।’ असा त्यांना मराठीविषयी सार्थ अभिमान आहे. अनेक थोर कवींनी, संतांनी मराठीचा गौरव केला आहे. इतिहासकालातही मराठीला योग्य ते स्थान लाभले. शिवरायांनी मराठीचा शब्दकोश तयार करवून घेतला. फारसी-अरबी भाषांचे, यावनी भाषेचे आक्रमण मराठीवर झाले; पण मराठी टिकून राहिली.

ज्या भाषेवर आपला पिंड पोसला गेला आहे, त्या आपल्या मायबोलीचे- मराठीचेपांग आपण फेडले पाहिजेत. आपल्या या भाषेच्या समृद्धीसाठी झटले पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठीचा वापर केला पाहिजे, तरच आपल्या मायबोलीचे ऋण आपण अंशतः फेडू शकू.

Set 2: मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi

पखिआंमध्ये कल्पतरू ।

भासांमध्ये मानु थोरू। मराठियेसी ।।

पक्ष्यांमध्ये मोराला आणि वृक्षांमध्ये कल्पतरूला जो मान आहे तोच सर्व भाषांमध्ये मराठीला आहे. असे फादर स्टीफन्स म्हणतो. या पोर्तुगीज परभाषिकाने मराठीचा केलेला गौरव मराठी भाषिकाला अभिमान वाटणारा आहे. संतांना तर मराठीबद्दल उत्कट अभिमान वाटायचा. महानुभाव पंथाचे सर्व धर्मग्रंथ मराठीत आहेत. एकदा केशवदेवाला वाटले की आपण एक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहावा व विद्वान पंडितांची मान्यता मिळवावी. त्याने नागदेवाचार्यांना आपला ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्याची अनुमती मागितली. याला नागदेवाचार्यांनी नकार दिला. ते म्हणाले की ग्रंथ मराठीतच असावा. श्री. ज्ञानदेवांनी तर माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।’ असे निर्भयपणे सांगून टाकले. अशी ही मराठी मायबोली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

राजारामशास्त्री भागवत आणि काही संशोधक विद्वान असेही सांगतात की कोणे एकेकाळी संपूर्ण भारताची भाषा मराठी हीच होती. असे असेल तर ती मोठी गर्वाची गोष्ट आहे.

मराठी काव्याची प्रभात म्हणता येईल असे शाहिरी वाङ्मय म्हणजे लावण्या व पोवाडे केवळ आहेत. मराठीतच संस्कृतपेक्षा मला मराठीच अधिक आवडते कारण संस्कृतमध्ये नसलेले ‘ळ’ हे अक्षर मराठीत आहे. संस्कृतसारखा व्याकरणाचा सोस मराठीला नाही. संस्कृतप्रमाणे ती केवळ ग्रंथभाषा नाही. ती एक लोकभाषा म्हणजे जीवंत भाषा आहे. ती जीवंत भाषा आहे म्हणूनच इतर भाषांतील सुंदर सुंदर शब्द तिने आत्मसात केले आहेत. आई, काका, अण्णा तिने कानडीतून घेतले आहेत.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा झाली आहे. पण अजूनही ती उच्चशिक्षणाचे माध्यम बनली नाही ही खंत आहेच. मराठी राजभाषा तर आहेच पण महानुभावपंथाने तिला धर्मभाषाही केले आहे. राघोबादादांनी मराठ्यांचा जरीपटका सतराव्या शतकात अटकेपर्यंत पोचवला पण महानुभावांनी मराठी भाषा त्याच्याही पूर्वी आणि त्याच्याही पलीकडे पोचवली आहे.

कॉर्ल मॉर्क्स इतकेच महत्त्वाचे व प्रखर तत्त्वज्ञान जगापुढे मांडले. ते आहेत. लोकमान्य टिळकांनी आपल्या करारी घोषणेने सारे राष्ट्र गदगदा महात्मा फुल्यांनी त्यांचे ग्रंथ मराठीत हलवून टाकले. ती त्यांची अमृतघोषणा ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही अस्सल मराठीतली आहे. भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीतूनच दलितांची अस्मिता जागृत केली.

आधुनिक काळात मराठीने जसे जागतिक कीर्तीचे विचारवंत निर्माण केले. तसेच तिने इतिहासातही केले. भारतात एक स्वतंत्र आणि वेगळा इतिहास घडवणाऱ्या स्वराज्यसंस्थापक शिवाजीने आपले आज्ञापत्र मराठीतून लिहवले.

कोकणी, देशी, कोल्हापूरी, सातारी, पुणेरी, खानदेशी, वऱ्हाडी, नागपुरी अशा विविध लोकबोली असलेली मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर आहे. कवी म्हणतो की इंद्राच्या दरबारातील सांडलेल्या अमृतातून मराठी बोल निपजले.

थेंब मातीनं झेलले।
जसं मिरंगाचं पानी वऱ्हाडीच्या (मराठीच्या)। शब्दाइले ।
वास चंदनाच्या वानी।।।

मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi

मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi

काही महिन्यांपूर्वी एका कॉलेजमध्ये कामानिमित्त गेलो होतो. एका मराठी वृत्तपत्राकरिता कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मला घ्यायच्या होत्या. “मराठी पेपरला ओपिनिअन दयायचं. आम्ही मराठी ‘रीड’च नाही करत. वुई डोन्ट लाइक टू रीड मराठी’, असे उत्तर त्या विद्यार्थ्याने दिलं. माझं मन विचार करू लागलं ते मराठी भाषेबद्दल. आज ‘मराठी’ विषयाची अनास्थाच दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणूनच ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयापुढे मला एक प्रश्नचिन्ह दयावसं वाटतं.

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायलाच हवा. मराठीविषयाच्या अनास्थेला जबाबदार कोण असेल, तर पहिला घटक ‘पालक’. आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावं की इंग्रजी माध्यमात. येथून पहिली वादाला सुरूवात होते. ‘मराठी शाळेचा दर्जा घसरत चाललाय’ असा एक आरोप केला जातो. पण हा दर्जा घसरायला जबाबदार कोण आहे ? आपण मराठी माणसंच ना? आम्ही कशाला सेंट झेविअर्स आणि सेंट टेरेसाच्या रांगा लावतो? का नाही आम्हाला मराठी माध्यमात घालावंसं वाटतं ? कारण आम्हालाच आमच्या मराठी भाषेचा अभिमान राहिलेला नाही.

घरामध्ये मराठी वृत्तपत्र यायला हवं, मराठी वाहिन्या, मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांचा आस्वाद घ्यायला हवा. “शी….. मराठी सिनेमा…. नॉट ॲट ऑल, अशी ओरड अनेक मराठी मुलंच करतात. फक्त ‘श्वास’ची झेप ऑस्करपर्यंत पोचली की आमचा मराठी बाणा जागृत होतो. इंग्रजी माध्यमातल्या कित्येकांना बालकवी, कुसुमाग्रज माहीत नसतात. रामायण – महाभारत त्यांना इंग्रजीतून ट्रान्सलेट करून . समजवावं (?) लागतं. ” –

लोकभाषा व ज्ञानभाषा या दोन्हीत वर्षानुवर्षे आपल्याकडे फारकतच झाली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ‘मातृभाषेतून शिक्षण द्यावे’ हा मुद्दा मांडला. पण सध्या आपल्या सरकारनेच ‘मराठी’ भाषेला पर्याय म्हणून जर्मन, आय.टी. असे विषय ठेवले आहेत. साहजिकच अधिक गुण मिळवण्यासाठी अनेक जण जर्मन किंवा आय.टी.ची
निवड करतात. पुन्हा मराठी माणूसच मराठी भाषेपासून दुरावतो. परकीय भाषा शिकायला माझा विरोध नाही. पण आपल्या मातृभाषेला विसरून चालणार नाही.

मराठी संस्कृतीतला ‘मातृदिन’ आम्हाला माहीत नसतो. आम्ही ‘मदर्स डे’ सेलिब्रेट (?) करतो. ‘श्रावण महिन्यात १५ ऑगस्ट येतो’ असे विधान जेंव्हा मुलं निबंधात लिहितात, तेंव्हा त्यांच्या अगाध ज्ञानाची प्रचिती येते. मातृभाषेतून शिकून आपण मागे पडत नाही, हा मुद्दाच कोणी लक्षात घेत नाही. दाक्षिणात्य राज्यात गेल्यावर तर आपल्याला तेथील लोक मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते असल्याचे जाणवते.

आपली मराठी भाषा नऊ रसांनी समृद्ध आहे. ‘खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’, ऐकताना मनातील स्फूर्ती जागृत होते. हे वीररसाचे उदाहरण. तर रेशमाच्या रेघांनी’ ऐकताना आपले पाय ताल धरू लागतात, हे शृंगाररसाचे उदाहरण ! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. ‘ऐका दाजिबा’ सारख्या गीतात गीतकाराला हिंदी लिहिताना ‘मराठी शब्द’ वापरावेच लागले. कशामुळे ? मराठी भाषेच्या गोडीमुळे !

‘मातृभाषेतून शिक्षण’ हा वादाचा मुद्दा कधीही न संपणारा आहे. सध्याचं मराठी माणसाचं बदलत चाललेलं मराठी पाहून हे विचार मांडले, इतकंच.

पुढे वाचा:

Leave a Reply