राजभाषा मराठी निबंध – Rajbhasha Marathi Nibandh

खूप पूर्वी म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस माधव जुलियन ह्या कवींनी एक गीत लिहिले होते. मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य ह्या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे. आणि खरेच कवीची ही इच्छा सार्थ ठरली कारण भाषावार प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्र हे वेगळे राज्य स्थापन झाले आणि मराठीला त्या राज्याच्या राजभाषेचा दर्जा मिळाला.

मराठी भाषेला तेराशे वर्षांपूर्वीपासूनची जुनी परंपरा आहे. त्यामुळे ती अभिजात भाषांमध्ये मोडते. तिच्या कुशीत शिवाजी महाराज, झाशीची राणी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राम गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर अशा थोर थोर माणसांचा जन्म झाला. तसेच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत एकनाथ, जनाबाई ह्या प्राचीन काळातील कवींनी तिच्यावर साज चढवले. त्यानंतरच्या काळात पाहिले तर बहिणाबाई, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, बा.सी. मकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके आदी साहित्यिकांनी मराठी भाषेत मोलाचे योगदान दिले. अशी ही मराठी भाषा महाराष्ट्र ह्या राज्याची राजभाषा झाली आणि तिला तिचे योग्य स्थान मिळाले.

आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अनेकविध संस्थानांमध्ये आणि ब्रिटिशांची सत्ता असलेल्या प्रांतांमध्ये विभागला गेला होता. ह्या सर्व प्रदेशांमध्ये कुठलाही मेळ नव्हता. म्हणजे वेगवेगळी भाषा बोलणारे प्रदेश एकाच संस्थानाच्या अखत्यारीत किंवा ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत होते. स्वातंत्र्या- नंतर लोकांच्या कल्याणासाठी काम करायचे झाले तर प्रशासनयंत्रणा लोकाभिमुख असणे गरजेचे होते. त्यासाठी एकच भाषा असलेल्या लोकांचे राज्य स्थापन केले तर ते अधिक चांगल्या त-हेने झाले असते.

त्यामुळे भाषावार प्रांतरचनेचा कायदा १९५६ साली करण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशी वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यात आली. सुरूवातीला महाराष्ट्रात मुंबई नव्हती. परंतु मराठी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मोठे आंदोलन उभारले. त्यात आचार्य अत्र्यांसारख्या मोठमोठ्या लोकांनी नेतृत्व केले होते. त्या आंदोलनात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. सरतेशेवटी लोकेच्छेला मान देऊन १ मे, १९६० ह्या दिवशी वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले आणि मराठी ही त्या राज्याची अधिकृत राजभाषा बनली. मराठी आज महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना भाषा येणे आवश्यक मानले जाते.

शासनाशी पत्रव्यवहार, वेगवेगळी प्रमाणपत्रे मराठीत दिली जातात. स्थानिक भाषेचे वापरातील प्रमाण आणि अनिवार्यता इतर राज्यांनी जेवढ्या प्रभावीपणाने केली आहे तेवढ्या प्रभावीपणे आपणही करणे गरजेचे आहे. म्हणजे मराठीची शान आणि तिला मिळणारामान नक्कीच वाढेल ह्यात शंका नाही.

राजभाषा मराठी निबंध – Rajbhasha Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply