बरे सत्य बोला यथातथ्य चाला – Bare SatyaBola Yatha Tathya Chala

समर्थ रामदासांनी म्हटले आहे की ‘बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहु मानिती लोक येणे तुम्हाला हे सुवचन अगदी खरे आहे.

खरोखरच, स्वार्थासाठी कधीही खोटे बोलू नये. एकदा खोटे बोलले की ते लपवण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते आणि माणूस वाईट गोष्टींच्या जाळ्यात सापडतो. आपल्या हातून दुस-याचे होता होईल तेवढे चांगलेच करावे. कुणाचेही अहित करू नये. हाच श्रेष्ठ धर्म आहे कारण तो माणुसकीचा धर्म आहे. आपण पाप आणि पुण्याच्या लंब्याचवड्या बाता मारतो परंतु प्रत्यक्षात तसे वागणे म्हणजेच परमेश्वराजवळ जाणे असते. तुकाराम म्हणतात,’ पुण्य पर उपकार, पाप हे परपीडा.’ ते अगदी खरे आहे.

निसर्गाकडे आपण पाहिले तर सर्वत्र चांगली वागणूकच भरून राहिलेली दिसते. नद्या आपले पाणी स्वतः पित नाहीत, वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाहीत. तसेच आपणही वागले पाहिजे. आपण ह्या समाजात राहातो. आपली नोकरी, उद्योग ह्याच समाजात राहून करतो. ह्याच समाजामुळे आपल्याला सुखी जीवन जगता येते. म्हणूनच आपण समाजाचे देणे लागतो. समाजातील सगळीच माणसे सुदैवी नसतात. दीन्, अनाथ, दुबळी, अपंग, गरीब, वृद्ध, रूग्ण अशीही बरीच माणसे ह्या समाजात असतात. त्यांच्यासाठी निःस्वार्थपणे कसलीही अपेक्षा न ठेवता झटणे म्हणजेच चांगले वर्तन. आपल्याला वेळ देता येत नसेल तर चांगले काम करणारी संस्था पाहून त्यांना इच्छेनुसार देणगीही आपण देऊ शकतो.

खोटे बोलण्यामुळे मनावर ताण येतो, खोटे काम केल्यामुळे पैसाअडका भरपूर मिळाला तरी त्यामुळे मनाची शांती मात्र हरवून जाते. म्हणूनच नेहमी खरे बोलावे, यथार्थ वागावे म्हणजे आपल्याला नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. आपली मुले आपले वर्तन पाहात असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असले तर ते आपल्या कृतीतूनच झाले पाहिजेत.

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, बाबा आमटे आदि लोकांनी निरलसपणे जनसेवा केली. प्रकाश आमटे, डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग इत्यादी माणसे आजही कष्ट करीत आहेत. त्यांचा आदर्श आपण डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे. मेल्यावर तर आपण चार आणेसुद्धा सोबत घेऊन जाणार नसतो. मग एवढी हाव कशासाठी? असा प्रश्न जर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला तर जगातील अर्धी कुकर्मे नष्ट होतील. मग माणसे खरे बोलू लागतील आणि यथातथ्य चालू लागतील.

पुढे वाचा:

Leave a Reply