बसस्थानकावरील दृश्य निबंध मराठी

मी रोज सकाळी सार्वजनिक परिवहनाच्या बसने शाळेत जातो. माझ्या घरापासून शाळा दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बसशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्या बसस्थानकावरून मी जातो ते बसस्थानक पूर्वी फारच बेशिस्त होते. म्हणजे तिथे बससाठी रांगा वगैरे लावण्याची पद्धतच नव्हती. एकाच स्थानकावर पाच सहा बस थांबत असल्यामुळे कुठल्या बससाठी कुठे रांग लावायची ते कळत नसल्यामुळे तसे होत असावे.

पण त्यामुळे बस आली की त्यात चढण्यासाठी एकच झुंबड उडत असे. त्या गर्दीत आणि खेचाखेचीत आम्हा शाळेत जाणा-या पाचवी सहावीतल्या मुलांची मात्र फारच वाट लागत असे. दप्तर, डबा घेऊन बसमध्ये चढणे आणि आपले ठिकाण आल्यावर उतरणे म्हणजे युद्ध खेळून आल्यासारखे होत असे. त्यामुळेच त्या बसस्थानकावर पाकिटमार लोकांचे चांगलेच फावले. कित्येक भल्या लोकांची पाकिटे मारली जाऊन त्यांना फारच नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यातच भर म्हणून बसस्थानकातल्या बाकांवर अनेक गर्दुल्ले बसत असत. भिकारी, चणेदाणेवाले, फेरीवाले ह्यांनीही बसस्थानकाचा परिसर व्यापून टाकला होता. कागदाचे कपटे आणि घाण जागोजाग पसरलेली होती.

तेव्हा मग आम्ही शाळेतील मुलांनीच पुढाकार घेऊन परिवहन अधिका-यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या बसस्थानकाची दुर्दशा सांगितली. आमचे बोलणे त्यांनी सहानुभूतीने ऐकून घेतले आणि त्यांना ते पटलेही. त्यानुसार त्यांनी कार्यवाही केली आणि आज आमचे बसस्थानक अगदी आदर्श म्हणावे तसे झाले आहे. आज तेथील दृश्य कसे असते?

मुळात त्यांनी एका बसस्थानकाची दोन बसस्थानके केली. म्हणजे एका दिशेने जाणा-या बसचे स्थानक वेगळे केले आणि दुस-या दिशेने जाणा-या बसचे स्थानक वेगळे केले. त्यामुळे लोक व्यवस्थित रांगा लावून उभे राहू लागले. वृद्धांप्रमाणेच शाळेतल्या मुलांनाही पुढल्या बाजूने चढण्याउतरण्यास परवानगी दिली. भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले ह्यांनी बसस्थानकातील जागा बळकावली होती तिथून त्यांना हिसकावून लावण्यात आले. कचरा टाकण्यासाठी वेगळी कचराकुंडी ठेवली. स्थानकाची साफसफाईसुद्धा रोजच्या रोज होऊ लागली. त्यामुळे प्रवासी लोकांची खूपच सोय झाली.

माझ्या शाळेत जातायेतानाच्या बसप्रवासाचे माझ्या आईला खूपच दडपण येत असे. ते तिच्या मनावरचे दडपण खूपच कमी झाले.

तर असे असते आमच्या बसस्थानकातील दृश्य. उद्याच्या भारतात हेच दृश्य जागोजाग दिसले पाहिजे.

मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी

पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणसाला जगाचे ज्ञान आणि पर्यटन आवश्यक आहे. मलाही अशा सहली आणि विविध ठिकाणे पाहण्याचा छंद आहे. असाच एकदा मी आई, बाबांबरोबर दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला फिरायला गेलो होतो. वातावरणात थोडासा थंडावा आणि समोर उंचच उंच डोंगर असे दृश्य होते वणीच्या एस.टी.बस स्थानकाचे.

आम्ही एस.टी.तून खाली उतरलो आणि समोर चणेवाला, लेमन गोळ्यावाले उभे राहिले. तेवढ्यात सात-आठ उसाच्या रसाचे काचेचे ग्लास घेऊन एक वयस्कर माणूस आला, खेडेगावातले बस स्थानक होते ते. परंतु लोकांनी मुंग्यांप्रमाणे गर्दी केलेली होती. बस स्थानक पत्र्याचे असूनही अगदी स्वच्छ होते. कोठेही कचरा नाही. कचरापेट्या जागोजागी होत्या. शेजारीच एक चांभार आपल्या कामात गुंग होता.

पोलिस प्रवाशांना रांगेत उभे रहा, शांतता पाळा असे सांगत होते. तेथील स्वच्छता पाहून मला शहराच्या अस्वच्छतेबद्दल वाईट वाटले. असे होते ते आदर्श, स्वच्छ बस स्थानक.

पुढे वाचा:

Leave a Reply